Khopoli News : मुलाला शाळेत सोडलं अन्...; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर दिवसाढवळ्या सपासप वार

खोपोली : रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या खोपोली शहरात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा थरार पाहायला मिळाला. खोपोली नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि शहरातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले मंगेश काळोखे यांची अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केली आहे. भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. हत्येनंतर शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, मुख्य बाजारपेठ आणि संवेदनशील भागांत कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



काळ्या कारमधून आले अन् वार केले...


मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश काळोखे हे आज सकाळी आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी घराबाहेर पडले होते. मुलाला शाळेत सुखरूप सोडून ते दुचाकीवरून घराकडे परतत असताना, वाटेतच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांचा गेम करण्याचा प्रयत्न केला. एका काळ्या रंगाच्या संशयास्पद चारचाकी गाडीतून आलेल्या ३ ते ४ जणांच्या टोळीने काळोखे यांची दुचाकी अडवली. त्यांनी काही समजण्यापूर्वीच हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की मंगेश काळोखे जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून हल्लेखोर आपली कार घेऊन घटनास्थळावरून वेगाने फरार झाले. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून, सध्या डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.



राजकीय सूड की 'सुपारी'?


नुकत्याच पार पडलेल्या खोपोली नगरपरिषदेच्या निवडणुकीतील विजयाचा आनंद ओसरण्यापूर्वीच शहरात रक्ताचा सडा पडला आहे. नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येमागे राजकीय वादाचा 'सूड' किंवा 'सुपारी' असण्याची शक्यता बळावली आहे. या भीषण घटनेनंतर रायगड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून संपूर्ण खोपोली शहराला सध्या पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मानसी काळोखे यांनी नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून नगरसेवक पद पटकावले होते. या विजयामुळे काळोखे कुटुंबाचा स्थानिक राजकारणात दबदबा वाढला होता. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, या वाढत्या प्रभावाचा राग किंवा निवडणुकीच्या निकालावरून असलेल्या जुन्या वादातूनच मंगेश काळोखे यांचा काटा काढण्यात आला असावा. स्थानिक वर्तुळात ही हत्या 'कॉन्ट्रॅक्ट किलिंग' किंवा सुपारी देऊन केली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.



तपासासाठी 'एलसीबी' सक्रिय; सीसीटीव्ही फुटेज हाती


घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण केला असून परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज आपल्या ताब्यात घेतले आहेत. संशयास्पद 'काळ्या गाडी'चा माग काढण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या असून प्रत्येक नाक्यावर कसून तपासणी केली जात आहे. "आम्ही तपासाच्या अगदी जवळ आहोत आणि काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत," असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.



खोपोलीत तणावपूर्ण शांतता


मंगेश काळोखे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन खबरदारी घेत असून संशयित आरोपींना लवकरच जेरबंद केले जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : नाशिक खरात प्रकरण: मंदिरातील देणग्या ते परदेशी दुव्यांपर्यंत SIT ची चौकशी

मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, विशेष तपास पथक (SIT) विविध अंगांनी चौकशी

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन