मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये विजय हजारे ट्रॉफीचा समावेश होतो. ही स्पर्धा १९९३-९४ पासून खेळवली जात आहे. बीसीसीआयने केलेल्या नियमानुसार आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंनाही दरवर्षी ठराविक देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळण्याचे बंधन आहे. या नियमामुळे रोहित शर्मा, विराट कोहली आदी दिग्गज क्रिकेटपटूही विजय हजारे ट्रॉफीचे सामने खेळताना दिसतील.
विजय हजारे ट्रॉफी २४ डिसेंबरपासून सुरू होत असून गट फेरीचे सामने ८ जानेवारीपर्यंत खेळवले जाणार आहेत. त्यानंतर १२ जानेवारीपासून नॉकआउट फेरीला (बाद फेरी) सुरुवात होईल. स्पर्धेचा अंतिम सामना १८ जानेवारी रोजी होणार आहे. चाहत्यांना आता विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना पुन्हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे.
या स्पर्धेत विराट आणि रोहित यांच्यासह रिषभ पंत, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग आणि अभिषेक शर्मा यांसारखे अनेक स्टार खेळाडू सहभागी होणार आहेत. मात्र सर्वांचे लक्ष प्रामुख्याने विराट कोहली आणि रोहित शर्मावर असणार आहे. बीसीसीआयने केंद्रीय करार असलेल्या खेळाडूंना किमान दोन विजय हजारे सामन्यांत खेळणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे हे सर्व दिग्गज खेळाडू मैदानात उतरतील, हे निश्चित झाले आहे.
विराट कोहली तब्बल १५ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीत पुनरागमन करत आहे. स्पर्धेआधी त्याने माजी भारतीय फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्यासोबत विशेष सराव केला. मुंबईत कसून मेहनत घेतल्यानंतर विराट दिल्ली संघाच्या सामन्यांसाठी बंगळुरू येथे पोहोचला आहे. दुसरीकडे, रोहित शर्मा २४ आणि २६ डिसेंबर रोजी जयपूरमध्ये सिक्कीम आणि उत्तराखंडविरुद्ध मुंबई संघाकडून खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्लीचे सुरुवातीचे सामने बंगळुरूमध्ये आंध्र प्रदेश आणि गुजरातविरुद्ध होणार आहेत.
यंदाच्या विजय हजारे ट्रॉफीत एलिट आणि प्लेट विभागात मिळून एकूण ३८ संघ सहभागी होत आहेत. एलिट गटात ३२ संघ असून त्यांचे प्रत्येकी आठ संघांच्या चार गटांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर संघांविरुद्ध एक सामना खेळेल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील, त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामना खेळवला जाईल. प्लेट गटात सहा संघांचा समावेश आहे.
गट फेरीचे सामने अहमदाबाद, बंगळुरू, अलूर, जयपूर आणि राजकोट येथील विविध मैदानांवर होणार आहेत. सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजता सुरू होतील. विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ चे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार असून, जिओ हॉटस्टार अॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
- ग्रुप अ: केरळ, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पुडुचेरी, त्रिपुरा
- ग्रुप ब: विदर्भ, हैदराबाद, बंगाल, बडोदा, आसाम, उत्तर प्रदेश, चंदीगड, जम्मू आणि काश्मीर.
- ग्रुप क: छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा, हिमाचल प्रदेश, पंजाब, मुंबई, उत्तराखंड, सिक्कीम.
- ग्रुप ड: रेल्वे, आंध्र, हरियाणा, गुजरात, सौराष्ट्र, दिल्ली, सेवा, ओडिशा.