विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने जिंकत भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. अर्धशतकवीर शफाली वर्मा सामनावीर झाली.
मालिकेतील पहिले दोन्ही सामने विशाखापट्टणम येथे झाले. पहिल्या सामन्यात भारताने आठ विकेट राखून विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात भारताने सात विकेट राखून विजय मिळवला. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने वीस षटकांत नऊ बाद १२८ धावा केल्या तर भारताने ११.५ षटकांत तीन बाद १२९ धावा केल्या.
श्रीलंकेकडून विश्मी गुणरत्नेने एक, चामरी अथापथ्थुने ३१, हसिनी परेराने २२, हर्षिता समरविक्रमने (धावचीत) ३३, कविशा दिलहारीने १४, नीलक्षीका सिल्वाने दोन, कौशानी नुथ्यांगनाने (धावचीत) ११, शशिनी गिम्हणीने शून्य, काव्या कविंदीने (धावचीत) एक, मल्की मदाराने एक धावांचे योगदान दिले. भारताकडून श्री चरणी आणि वैष्णवी शर्माने प्रत्येक दोन तर स्नेह राणा आणि क्रांती गौडने प्रत्येकी एक विकेट घेतली.
धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताकडून स्मृती मंधानाने १४, शफाली वर्माने नाबाद ६९, जेमिमा रॉड्रिग्जने २६, हरमनप्रीत कौरने १०, रिचा घोषने नाबाद एक धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून कविशा दिलहारी, मल्की मदारा आणि काव्या कविंदी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.