‘सेव्हन सिस्टर्स’ला वेगळे पाडण्याच्या धमकीबाबत व्यक्त केली तीव्र चिंता
नवी दिल्ली : बांगलादेशातील ढाक्यातील भारतीय उच्चायुक्तालयास मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर भारताने बांगलादेशचे उच्चायुक्त एम. रियाझ हमीदुल्ला यांना समन्स बजावले. ईशान्येकडील राज्यांना उद्देशून ‘सेव्हन सिस्टर्स’ला वेगळे ठेवण्याची धमकी देणाऱ्या एका नेत्याच्या वक्तव्यानंतर अवघ्या एका दिवसात ही कारवाई करण्यात आली. भारताने एम. रियाझ हमीदुल्ला याच्याकडे या प्रकरणी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यांना एकत्रितपणे ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हणून ओळखले जाते. नॅशनल सिटिझन पार्टीचा (एनसीपी) म्होरक्या हसनत अब्दुल्ला याने पुन्हा एकदा भारतविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे. बांगलादेश अस्थिर झाल्यास ईशान्य भारतातील सात राज्ये (सेव्हन सिस्टर्सला) वेगळे पाडण्याची आणि ईशान्येकडील फुटीरतावाद्यांना आश्रय देण्याची धमकी त्याने दिली आहे. आपल्या तीव्र भारतविरोधी वक्तृत्वासाठी ओळखले जाणारा अब्दुल्ला हा विद्यार्थी-नेतृत्वाखालील एनसीपीचे मुख्य संघटक आहे.