नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला सध्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. विमानांच्या वेळापत्रकात आलेल्या प्रचंड गोंधळामुळे प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. अनेक उड्डाणांमध्ये तासनतास विलंब, अचानक रद्द होणारी उड्डाणे आणि प्रवाशांवरील वाईट वागणूक या घटनांमुळे कंपनीची प्रतिमा मोठ्या प्रमाणात धोक्यात आली आहे.
या इंडिगो एअरलाईन्सच्या समस्यांमुळे संतप्त झालेले जवळपास ८२९ प्रवासी एकत्र येऊन इंडिगोविरुद्ध न्यायालयात भरपाईसाठी सामूहिक खटला दाखल करण्याची तयारी करत आहेत. या खटल्याचे नेतृत्व हवाई वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि ग्राहक संरक्षण वकील डॉ. सुधीर शुक्ला करणार आहेत. शुक्ला यांनी सांगितले की, प्रवाशांना झालेल्या नुकसानीसाठी योग्य न्याय मिळावा आणि कंपनीला आपली जबाबदारी समजावी, यासाठी हा सामूहिक दावा दाखल केला जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून इंडिगोचे विमान वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. अचानक विमान रद्द होणे आणि प्रवाशांना बोर्डिंगपासून वंचित ठेवणे हे नित्याच्या घटनांमध्ये रूपांतरित झाले आहे. प्रवाशांना वेळेवर आणि योग्य माहिती दिली जात नसल्याने, ग्राहक सेवा विभागाकडूनही अपेक्षित सहकार्य मिळत नाही, अशी अनेक तक्रारी प्रवाशांकडून समोर येत आहेत.