मुंबई : महापालिका निवडणुकांची प्रतिक्षा अखेर संपण्याच्या मार्गावर आहे.नगर परिषद निवडणुका पार पाडल्यानंतर आता राज्याचे लक्ष महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीकडे लागले आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे काउंटडाऊन सुरू झाले आहे.
सात-आठ वर्ष रखडलेल्या या निवडणुकांची घोषणा १५ डिसेंबर नंतर कधीही होऊ शकते , अशी विश्वसनीय माहिती समोर आली आहे. निवडणुकीच्या घोषणेसोबच आचारसंहिता लागू होईल आणि निवडणूक प्रक्रियेला वेग येईल. आगामी १५ डिसेंबर रोजी राज्यातील १०० हून अधिक मोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच १५ डिसेंबरनंतर निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आणखी वाढली आहे.
राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी नागपूर आणि चंद्रपूर येथे ओबीसी आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक आहे. मात्र उर्वरित २७ महानगरपालिका निवडणुकांसाठी मार्ग खुला झाला असल्याचे संकेत आधीच निवडणूक आयोगाकडून देण्यात आले होते. त्यामुळे आता पुढील आठवड्यातील निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सगळ्यांचे लक्ष आहे.
महापालिकांसाठी कधी होणार मतदान?
सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे यावेळी निवडणूक प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाईल. याआधी २०१७ मध्ये निवडणुकीची घोषणा आणि मतदान यात दोन महिन्यांचे अंतर होते.