Sunday, March 15, 2026

महाराष्ट्राच्या 'कोल्हापुरी'चा डंका सातासमुद्रापार; डिझाइन आणि मार्केटिंगसाठी 'प्राडा' मदत करणार

महाराष्ट्राच्या 'कोल्हापुरी'चा डंका सातासमुद्रापार; डिझाइन आणि मार्केटिंगसाठी 'प्राडा' मदत करणार

नागपूर : पायाला भिडणारी पण जगभरात रुबाबदार समजली जाणारी महाराष्ट्राची 'कोल्हापुरी चप्पल' आता आंतरराष्ट्रीय फॅशन विश्वात मानाचे स्थान पटकावणार आहे. जगप्रसिद्ध लक्झरी ब्रँड 'प्राडा' (Prada) आणि राज्य सरकारचे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ (LIDCOM) यांच्यात महत्त्वपूर्ण करार झाला असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांना दिली.

नेमका काय आहे हा प्रकल्प?

संजय शिरसाट यांनी सांगितले की, कोल्हापुरी चपलांचे पारंपरिक सौंदर्य आणि 'प्राडा'चे जागतिक दर्जाचे मार्केटिंग व डिझाइन यांचा संगम या प्रकल्पातून होणार आहे. कोल्हापूर आणि आजूबाजूच्या भागातील चर्मकार समाजातील कारागिरांनी बनवलेल्या चपला आता 'प्राडा'च्या ब्रँडखाली जगभरात विकल्या जातील. यासाठी 'प्राडा' कंपनी स्थानिक कारागिरांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फिनिशिंग आणि डिझाइनचे प्रशिक्षणही देणार आहे.

"कारागिरांचे नशीब पालटणार" - संजय शिरसाट

या उपक्रमाबाबत उत्साहाने माहिती देताना शिरसाट म्हणाले, "आमच्या चर्मकार समाजाकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेली कला आहे, पण त्यांना योग्य बाजारपेठ आणि दाम मिळत नव्हता. आता 'प्राडा'सारखा मोठा ब्रँड आपल्यासोबत आल्यामुळे या कारागिरांच्या कलेला सोन्याचा भाव मिळेल. जी चप्पल स्थानिक बाजारात ५००-१००० रुपयांना विकली जाते, तीच चप्पल आंतरराष्ट्रीय बाजारात १०-१५ हजार रुपयांना विकली जाईल आणि त्याचा थेट फायदा आमच्या कारागिरांना होईल."

फेब्रुवारी २०२६ पर्यंत उत्पादन बाजारात

सरकारने या प्रकल्पासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या काही महिन्यांत प्रशिक्षण पूर्ण होऊन, फेब्रुवारी २०२६ पर्यंत 'प्राडा-कोल्हापुरी' हे संयुक्त उत्पादन जागतिक बाजारात उपलब्ध होईल, असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केला.

महत्त्वाचे फायदे:

  1. जागतिक ओळख: कोल्हापुरी चप्पल आता पॅरिस, मिलान आणि लंडनच्या शोरूममध्ये दिसेल.
  2. आधुनिक तंत्रज्ञान: कारागिरांना पारंपारिक पद्धतीसोबतच आधुनिक मशिनरी आणि तंत्रज्ञान सरकार पुरवणार आहे.
  3. रोजगार वाढ: या करारामुळे ग्रामीण भागातील हजारो तरुणांना रोजगार मिळेल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल.
  4. विरोधक केवळ टीका करत असताना, महायुती सरकारने चर्मकार समाजाच्या उत्थानासाठी हे ठोस पाऊल उचलल्याचे शिरसाट यांनी यावेळी अधोरेखित केले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >