नागपूर : महाराष्ट्र हे गुंतवणुकीच्या बाबतीत देशात एक नंबरचे राज्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्याच्या अर्थव्यवस्थेला आणि रोजगार निर्मितीला कलाटणी देणारी मोठी घोषणा केली. राज्यात 'ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर'चा (GCC) आशियातील सर्वात मोठा प्रकल्प येणार असून, त्या माध्यमातून तब्बल ४५ हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी सभागृहात दिली.
४५ हजार नोकऱ्यांचे 'गिफ्ट'
राज्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी महायुती सरकारने कंबर कसली आहे. याबद्दल माहिती देताना फडणवीस म्हणाले, "आम्ही एक खूप मोठा प्रकल्प निश्चित केला आहे. हा एक GCC (Global Capability Center) प्रकल्प असून, आशिया खंडात पहिल्यांदाच २ दशलक्ष (2 Million) स्क्वेअर फुटांचा हा भव्य प्रकल्प उभारला जाईल. या एकाच प्रकल्पामुळे राज्यात ४५ हजार तरुणांना थेट रोजगार मिळणार आहे. लवकरच यासंदर्भातील सामंजस्य करार (MoU) करण्यात येईल." हा प्रकल्प प्रामुख्याने मुंबई आणि पुण्यात सुरू होईल, ज्यामुळे या शहरांचा चेहरामोहरा बदलेल.
मायक्रोसॉफ्ट आणि FedEx सोबत मोठी उडी
केवळ नोकऱ्याच नव्हे, तर तंत्रज्ञानाच्या बाबतीतही महाराष्ट्र जगात आघाडीवर रहावा, यासाठी फडणवीस प्रयत्नशील आहेत. त्यांनी सांगितले की, "मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्य नडेला यांच्याशी आपली सविस्तर चर्चा झाली आहे. मायक्रोसॉफ्टसोबत १७ अब्ज डॉलर्सचा (सुमारे १.४० लाख कोटी रुपये) मोठा करार झाला आहे." तसेच, जागतिक लॉजिस्टिक कंपनी FedEx सोबतही चर्चा झाली असून, त्यांचाही GCC प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
गुन्हेगारी रोखण्यासाठी 'AI'चा वापर
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रशासनात कसा करता येईल, याचे व्हिजन फडणवीस यांनी मांडले. "सत्य नडेला यांच्याशी बोलताना, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) चा वापर करून क्राईम कंट्रोल (गुन्हेगारी नियंत्रण) कसे करता येईल, यावर भर देण्यात आला. भविष्यात पोलिसांना आणि तपास यंत्रणांना AI ची मोठी मदत होणार आहे," असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्य नडेला यांच्यातील चर्चेचाही सकारात्मक परिणाम राज्याला मिळणार आहे.
संस्कृत नेत्याला आदरांजली
विकासाच्या गप्पांमधेच राजकीय संस्कृतीचे दर्शनही फडणवीस यांनी घडवले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना फडणवीस भावूक झाले. "शिवराज पाटील हे केवळ काँग्रेसचे नेते नव्हते, तर देशाचे एक मोठे आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व होते. ते अत्यंत अभ्यासू होते आणि नेहमीच संविधानाचा आणि सभ्यतेचा आदर करत. माझे त्यांच्याशी खूप चांगले आणि जवळचे संबंध होते. अनेकदा फोन करून ते माझ्या निर्णयांचे कौतुक करत असत," अशा शब्दांत फडणवीस यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज वाढदिवस असल्याने फडणवीस यांनी सभागृहाच्या वतीने त्यांनाही शुभेच्छा दिल्या.






