Thursday, March 26, 2026

समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य; मानवी चुका टाळण्यासाठी उपाययोजनांवर भर

समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य; मानवी चुका टाळण्यासाठी उपाययोजनांवर भर

नागपूर : राज्याच्या विकासाची भाग्यरेषा ठरलेल्या 'समृद्धी महामार्गा'वर प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. महामार्गावरील अपघातांची आकडेवारी सरकारने अत्यंत पारदर्शकपणे सभागृहात मांडली असून, केवळ पायाभूत सुविधाच नव्हे, तर वाहन चालवताना होणाऱ्या मानवी चुकांकडेही गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत राज्यमंत्री मेघा बोर्डीकर यांनी आज विधानपरिषदेत व्यक्त केले.

अपघातांचे विश्लेषण आणि सरकारी वास्तव

विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना राज्यमंत्री मेघा बोर्डीकर यांनी कोणतीही लपवाछपवी न करता २०२३ ते २०२५ या कालावधीतील आकडेवारी स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, "या कालावधीत ४२५ अपघात झाले असून, त्यामध्ये ४०५ व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र, या अपघातांचे तांत्रिक विश्लेषण केले असता, हे अपघात रस्त्याच्या त्रुटींमुळं नसून प्रामुख्याने मानवी चुकांमुळे होत असल्याचे समोर आले आहे." सरकारने निदर्शनास आणून दिले की, जास्त वेगाने गाडी चालवणे (Overspeeding), चालकाला डुलकी लागणे, टायर फुटणे, सुरक्षित अंतर न ठेवणे आणि चुकीचे ओव्हरटेकिंग हीच अपघातांची प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे सरकारने आता जनजागृती आणि नियम पालनावर अधिक भर देण्याचे धोरण स्वीकारले आहे.

सत्ताधारी बाकांवरील सदस्य आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सिन्नर येथील महिला स्वच्छतागृहांच्या अवस्थेबाबत प्रशासनाचे कान टोचले. "सिन्नर येथे महिला स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय घाण असून ती तातडीने सुधारली पाहिजे," अशी रोखठोक भूमिका वाघ यांनी मांडली. सरकारने या तक्रारीची अत्यंत गंभीर दखल घेतली असून, संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना तातडीने स्वच्छता आणि डागडुजी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महिलांच्या सुरक्षेच्या आणि सोयीच्या बाबतीत सरकार तडजोड करणार नाही, असे संकेत यावेळी देण्यात आले.

तंत्रज्ञानाचा वापर वाढवणार

याच चर्चेदरम्यान सभापतींनी प्रवाशांच्या सोयीसाठी 'गुगल मॅप'वर (Google Maps) रेस्ट स्टॉप्सचे लोकेशन अपडेट करण्याची महत्त्वाची सूचना केली. ही सूचना सरकारने तत्काळ मान्य केली असून, प्रवाशांना महामार्गावर सुविधा शोधताना त्रास होऊ नये, यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. विरोधक मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या एअर ॲम्ब्युलन्स आणि इतर सुविधांच्या मुद्द्यावरही सरकार टप्प्याटप्प्याने काम करत असून, समृद्धी महामार्ग हा 'अपघातमुक्त' करण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्नशील असल्याचे या चर्चेतून दिसून आले.

Comments
Add Comment