अनुभवा वेदनामुक्त मातृत्व

स्त्री आरोग्य : डॉ. स्नेहल पाटील


प्रसूती ही स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची, आनंददायी पण त्याचवेळी वेदनादायक प्रक्रिया आहे. प्रसूतीदरम्यान येणाऱ्या वेदना या नैसर्गिक असून त्यांची तीव्रता प्रत्येक स्त्रीमध्ये वेगळी असते. काही महिलांना सौम्य वेदना होतात, तर काहींना अत्यंत तीव्र वेदना सहन कराव्या लागतात. आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे आज प्रसूतीदरम्यान वेदना कमी करण्यासाठी अनेक पद्धती उपलब्ध आहेत. त्यापैकी एपिड्युरल अॅनल्जेसिया ही सर्वात प्रभावी आणि सुरक्षित पद्धत मानली जाते.


एपिड्युरल अॅनल्जेसिया म्हणजे काय? हा एक वेदनाशामक उपाय असून त्यामध्ये पाठीच्या कण्याजवळील ‘एपिड्युरल स्पेस’मध्ये विशिष्ट औषधे (लोकल अॅनस्थेटिक व वेदनाशामक औषधे) देण्यात येतात. ही औषधे मेंदूकडे जाणारे वेदनांचे संदेश अंशतः किंवा पूर्णपणे थांबवतात, त्यामुळे प्रसूतीदरम्यान होणाऱ्या वेदनांची तीव्रता लक्षणीयरीत्या कमी होते. आई पूर्णपणे शुद्धीत राहते आणि प्रसूतीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग
घेऊ शकते.


एपिड्युरल देण्याची प्रक्रिया साधारणपणे पहिल्या टप्प्यात, गर्भाशयाची पोकळी ३ ते ४ सें.मी. उघडल्यावर केली जाते. भूलतज्ज्ञ पाठीवर योग्य ठिकाणी सुई टोचून एक बारीक नळी (कॅथेटर) एपिड्युरल स्पेसमध्ये बसवतात. त्यातून आवश्यकतेनुसार औषधांचा पुरवठा चालू ठेवला जातो. यामुळे वेदना आटोक्यात राहतात आणि प्रसूती अधिक सहनशील होते.


एपिड्युरलचे फायदे अनेक आहेत. सर्वात मोठा फायदा म्हणजे वेदनांवर प्रभावी नियंत्रण. त्यामुळे आई घाबरत नाही, मानसिक तणाव कमी होतो आणि तिची ऊर्जा वाया न जाता ती बाळ जन्माला घालण्यासाठी वापरता येते. उच्च रक्तदाब, हृदयविकार किंवा दमा असलेल्या गर्भवती महिलांसाठी एपिड्युरल विशेष फायदेशीर ठरते, कारण तीव्र वेदनांमुळे होणारे रक्तदाबातील चढउतार टाळता येतात. याशिवाय, प्रसूतीदरम्यान अचानक सिझेरियन शस्त्रक्रियेची गरज भासल्यास, हाच एपिड्युरल पुढे वापरता येतो.


तथापि, प्रत्येक वैद्यकीय हस्तक्षेपाप्रमाणे एपिड्युरलचे काही दुष्परिणामही असू शकतात. काही महिलांमध्ये रक्तदाब कमी होणे, डोकेदुखी, चक्कर येणे किंवा पाय सुन्न होणे दिसून येते. क्वचित प्रसंगी पाठदुखी किंवा संसर्गाची शक्यता असते. मात्र, अनुभवी भूलतज्ज्ञांकडून योग्य काळजी घेऊन दिल्यास हे धोके अत्यंत कमी असतात. त्यामुळे एपिड्युरल घेण्यापूर्वी संपूर्ण माहिती डॉक्टरांकडून घेणे अत्यंत आवश्यक आहे.


अनेक महिलांना असा गैरसमज असतो की, एपिड्युरलमुळे प्रसूती लांबते किंवा सिझेरियनची शक्यता वाढते. प्रत्यक्षात, आधुनिक संशोधनानुसार योग्य प्रमाणात व योग्य वेळी दिलेला एपिड्युरल यामुळे सिझेरियनचे प्रमाण वाढत नाही. उलट, वेदना कमी झाल्यामुळे आई अधिक आरामात सहकार्य करू शकते आणि नैसर्गिक प्रसूतीची शक्यता वाढू शकते. आणखी एक गैरसमज असा आहे की एपिड्युरलमुळे बाळावर वाईट परिणाम होतो. वास्तविक, योग्य पद्धतीने दिल्यास बाळावर कोणताही घातक परिणाम होत नाही.


स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून माझा अनुभव सांगते की, प्रसूती हा केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक प्रवास असल्यामुळे आईचा आत्मविश्वास व आराम महत्त्वाचा असतो. एपिड्युरल अॅनल्जेसिया ही पद्धत महिला सशक्तीकरणाचाच एक भाग ठरू शकते, कारण ती तिला वेदनामुक्त व सन्मानाने मातृत्वाच्या अनुभवाचा आनंद देऊ शकते.


शेवटी, एपिड्युरल घ्यायचे की नाही याचा निर्णय हा पूर्णपणे गर्भवती महिलेचा असावा. डॉक्टरांनी तिला सर्व फायदे-तोटे समजावून सांगून माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करावी. प्रसूतीतील उद्देश फक्त बाळाच्या जन्माचा नसून, आईलाही सुरक्षित व सुखद अनुभव देणे हा असावा आणि त्यासाठी एपिड्युरल अॅनल्जेसिया ही एक प्रभावी व वैज्ञानिक पर्याय आहे.

Comments
Add Comment

महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात, घेतला मोठा निर्णय

महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी महायुती सरकार आता मैदानात उतरले आहे. लवकरच महायुती सरकार महिला

नक्षत्रांचे देणे

आशय : वीणा सानेकर रक्ताच्या नात्यांमध्ये खूपदा अहंकार डोकावतात. त्यात मालमत्तेची गणिते असतात. हक्कांचे वाद

छोटा चौकोन, मोठा चौकोन आणि छोट्टुसा चौकोन

फेरफटका : सीमा मालाणी आम्ही लहान असताना आमची मोठी भावंडे कॉलेजात होती. त्यावेळी घरोघरी एकत्र कुटुंब पद्धती होती.

आदिवासी हक्काच्या लढाईसाठी बळ

जंगल राणी न्यूज प्लॅटफॉर्म, फोर्ब्स इंडिया सन्मान उडिसाच्या एका अग्रगण्य टीव्ही चॅनलमध्ये सुमारे सहा महिने काम

गुड न्यूज ! सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, सोन्याचे आजचे दर किती ?

नवी दिल्ली : सध्या लग्नसराई सुरु आहे, पण सोन्याचे वाढते दर पाहता एन लग्नसराईत सोने खरेदी करावी की नाही असा प्रश्न

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह