नागपूर : "विरोधकांना राज्य दिवाळखोर दाखवायची घाई झालेली आहे. पण, राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीची असली तरी दिवाळखोरीत नाही. देशातील मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अव्वल आहे. आमच्याकडे खूप पैसे आहेत असा दावा मी करत नाही, पण हाती घेतलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी पुरेसे पैसे आहेत", असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह महायुती सरकारमधील मंत्री उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, "विरोधकांच्या पत्रकार परिषदेत अनेक गमतीदार गोष्टी घडल्या. उदाहरणार्थ, उबाठाला काँग्रेस इमानदार आणि सुसंस्कृत होती अशी नवीन उपपत्ती झाली. तसेच, विरोधकांच्या पत्रावर शरद पवार गटाच्या कोणाचीही सही नव्हती", अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.शेतकरी कर्जमाफीबाबत फडणवीस म्हणाले, "योग्य आणि पात्र शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळाली पाहिजे. त्यासाठी प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. समितीच्या शिफारशींनुसार धोरण तयार करू आणि पात्र शेतकऱ्यांना लाभ देऊ. अतिवृष्टीग्रस्तांपैकी ९२ टक्के शेतकऱ्यांना (९० लाखांपेक्षा जास्त) मदत मिळाली आहे. उर्वरित ८ टक्के शेतकऱ्यांच्या केवायसीचा प्रश्न सोडवला जात आहे. १० हजार रुपयांची अतिरिक्त मदतही पूर्णपणे दिली आहे, असे त्यांनी सांगितले.
जन सुरक्षा विधेयकाचे काम अंतिम टप्प्यात!
- विरोधकांच्या विदर्भावरील टीकेवर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, "२०१४ नंतर विदर्भात मोठे बदल झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात सिंचन, रस्ते आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा झाली आहे. विरोधकांना सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग, सभापती यांसारख्या संवैधानिक संस्थांचा आदर नसल्यामुळे ते नेरेटिव्ह पसरवण्याचे काम करीत आहेत.
- अधिवेशनाबाबत ते म्हणाले, "अधिवेशन लहान आहे, कारण आचारसंहितेमुळे पूर्ण कामकाज घेता येत नाही. तरीही आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. नागपुरात अधिवेशन सकाळी लवकर सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत चालते, त्यामुळे कामकाजाचे तास कमी होणार नाहीत."
- अधिवेशनात १८ विधेयके मांडली जाणार असून, त्यातील काही छोटी आणि अनुषंगिक आहेत. लोकपाल विधेयकात केंद्राने एक सुधारणा सुचवली आहे, ज्यात केंद्राचे अधिकारी वगळण्यात येणार आहेत. जन सुरक्षा विधेयक अंतिम टप्प्यात आहे", अशी माहिती त्यांनी दिली.
विरोधकांनी आत्मचिंतन करावे - एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "महायुती सरकारच्या दुसऱ्या इनिंगला नुकतेच एक वर्ष झाले. या अधिवेशनात आम्ही विदर्भातील प्रश्नांना न्याय देऊ. विरोधक चहापानावर बहिष्कार टाकतात, पण आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी अधिवेशन चालवतो. विरोधक दिशाहीन आहेत. निवडणुकीत नेते घरात बसले, कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले. मी विश्वासाने सांगू शकतो, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही ७०-७५ टक्के यश मिळवू. शेतकरी, सिंचन, आरोग्य, बेरोजगारी यावर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. विरोधी पक्षनेत्यासाठी जनतेने त्यांना पुरेसे संख्याबळ दिले नाही, त्यांनी आत्मचिंतन करावे", असा टोला देखील त्यांनी लगावला.