वैद्यकीय आरोग्य अधिकारी भरती प्रक्रियेत गोंधळ
निकालानंतर ‘अतिरिक्त गुण’ नियम बदलाचा निर्णय वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांना अतिरिक्त ५ ते १० गुण देण्याचा निर्णय घेतला. निवड प्रक्रियेत निकालानंतर फेरफार केल्याने नियुक्तीमध्ये गैरव्यवहार होण्याची शंका उमेदवारांकडून व्यक्त होत आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक, गुणवत्तापूर्वक करण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे.
मुंबई : प्रभाग कार्यालयांमधील वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदाच्या भरती प्रक्रियेतील गैरप्रकाराला आळा घालण्यााठी यंदा मुंबई महानगरपालिकेने परीक्षा पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला. भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल लागून जवळपास ४५ दिवस उलटले. मात्र अद्यापही महानगरपालिकेकडून भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. भरती प्रक्रियेला होत असलेल्या विलंबामुळे उमेदवार संतप्त झाले असून, त्यामध्ये गैरव्यवहार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी हे पद महत्त्वपूर्ण समजले जाते. खाद्यपदार्थ विक्री परवाने, सश्रुषागृह परवानगी आणि इतर सार्वजनिक आरोग्यविषयक परवाने आदी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांकडे असतात. मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागामधील हे पदे मागील अनेक वर्षांपासून अंतर्गत भरतीद्वारे मुलाखतीच्या माध्यमातून भरले जात होते. मात्र त्यामध्ये गैरव्यवहार व भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे ही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी मुंबई महानगरपालिकेने यंदा प्रथमच ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १० ऑक्टोबरला परीक्षा झाली. ही परीक्षा सकाळी ११ वाजता होणार होती. मात्र ती दुपारी घेण्यात आली. तसेच ही परीक्षा ऑनलाईनऐवजी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली.
परीक्षेच्या वेळी अचानक करण्यात आलेल्या या बदलामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते. परीक्षा झाल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे उत्तीर्ण उमेदवारांना लवकरच भरती होण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र निकाल लागून ४५ दिवस उलटले तरी मुंबई महानगरपालिकेने याबाबत पुढील प्रक्रिया राबवलेली नाही. यामुळे उमेदवार संतप्त झाले आहेत. परिक्षेच्या निकालानंतर तब्बल दीड महिन्यांचा कालावधी लोटला तरी प्रशासन ना भरती करत आहे, ना भरती विलंबाबाबत जाहीरपणे कोणतेही स्पष्टीकरण देत नाही, यामुळे उमेदवारांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्य विभागात पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. लवकरच भरती प्रक्रिया न राबविली गेल्यास उमेदवार न्यायालयाचेही दरवाजे ठोठावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार मोठा आहे. मनपा कार्यक्षेत्रातील लोकसंख्या ही देशातील काही लहान राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. या अफाट लोकसंख्येला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देताना पालिकेच्या रुग्णालयीन स्थानिक व्यवस्थापणाला तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कमालीच्या तणावाखाली काम करावे लागत आहे, तरी भरतीस मनपा विलंब करत आहे.
यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेचे उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे आणि उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. ओमप्रकाश वाल्लेपवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही.