Monday, December 29, 2025

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सव

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सव

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या खमंग खाद्य पदार्थांचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा या उद्देशाने राजधानी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन 12 ते 14 डिसेंबर 2025 दरम्यान करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आणि सचिव आर. विमला यांनी दिली.

कस्तुरबा मार्गावरील महाराष्ट्र सदनात आयोजित या महोत्सवात महाराष्ट्राच्या विविध प्रादेशिक खाद्यसंस्कृतीचा आणि कलेचा संगम पाहायला मिळणार आहे. चवदार पदार्थांची रेलचेल दिल्लीकरांना या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. खाद्य महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते होणार आहे.

खाद्य महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ उपलब्ध असतील. नागपूर विभागातील सावजी चिकन, मटण रस्सा, तर्री पोहा आणि संत्री-आधारित मिठाई; पुणे भागातील मिसळ-पाव, वडा पाव आणि पुरणपोळी, जळगावातील शेव भाजी, वांग्याचे भरित आणि केळीशी संबंधित पदार्थ; मालवणातील मालवणी सीफूड, कोंबडी वडे आणि सोलकढी; छत्रपती संभाजी नगरमधील नान कालिया, डालिंबी उसळ आणि स्थानिक बिर्याणी; तसेच कोल्हापुरी नॉन-व्हेजमधील तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि कोल्हापुरी चिकन किंवा मटण यांचा समावेश असेल. हे पदार्थ महाराष्ट्राच्या समृद्ध पाककृती परंपरेचे प्रतिनिधित्व करतील. या खाद्य महोत्सवात सातारा, कोल्हापूर, जळगाव,पुणे अमरावती, रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतर्गत असलेले महिला स्वयंम सहायता समूह सहभागी होणार असून त्यांच्याकडील रुचकर पदार्थांचा देखील गरमागरम आस्वाद घेता येणार आहे.

हा महोत्सव केवळ खाद्यपदार्थांपुरता मर्यादित नसून, महाराष्ट्राची समृद्ध कला आणि संस्कृती दर्शवणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.लहान मुलांसाठी खास आकर्षण म्हणून ‘करमणूकीचे’चे खेळ आणि जादूचे प्रयोग याचे आयोजन करण्यात आले. ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना या महोत्सवाचा आनंद घेता येईल.

या महोत्सवात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (एमटीबीसी) विशेष माहिती स्टॉल देखील असणार आहे. या स्टॉलद्वारे महाराष्ट्रातील ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळांची माहिती देण्यात येईल. पर्यटन स्थळांच्या माहितीपत्रकांचे वितरण करून महाराष्ट्राच्या पर्यटनाला अधिकाधिक चालना देण्याचा मानस असल्याचे निवासी आयुक्त आर. विमला यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राच्या अस्सल चवीचा संस्कृतीचा, पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी दिल्लीतील नागरिकांनी या तीन दिवसीय खाद्य महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी आयुक्त आर. विमला यांनी केले आहे.

Comments
Add Comment