मुंबई, नवी मुंबई विमानतळांदरम्यानचा प्रवास होणार सुसाट
मुंबई : मुंबईमध्ये मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहेत. मेट्रोमुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होत आहे. भविष्यात मुंबईमध्ये आणखी मेट्रो सुरू होणार आहेत. त्यापैकीच एक असणारा मार्ग मेट्रो लाईन ८ आहे. या मेट्रो मार्गामुळे दोन तासांचा प्रवास फक्त ३० मिनिटांत पूर्ण होणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोणारा हा मेट्रो मार्ग असेल. या मेट्रो मार्गासाठी वेगात काम सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी २३ हजार कोटींच्या प्रकल्पाच्या ब्लूप्रिंटला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
मुंबई आणि उपनगरात दररोज लाखो लोकांचा प्रवास होतो. महाराष्ट्रासह देशातून आणि विदेशातून मुंबईमध्ये येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. व्यावसायिक, पर्यटक, चित्रपट, कला, शिक्षणासह रोजगारांसाठी मुंबईमध्ये लाखो लोक येतात. वाढत्या लोकसंख्यामुळे मुंबईमध्ये वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात येतेय.
यावरच उपाय काढण्यासाठी मेट्रोचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईमध्ये मेट्रोचं जाळ विकसीत केल्यास वाहतूक कोंडी सुटणार आहे. मेट्रो ८ मुळे मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरात असणारी विमानतळे जोडली जाणार आहेत. मुंबई आणि नवी मुंबईतील विमानतळांना जोडण्यासाठी राज्य सरकारकडून मास्टरप्लान तयार करण्यात आला आहे.
२३ हजार कोटींचा हा नवीन प्रोजेक्ट येणाऱ्या काही वर्षांमध्ये मुंबई आणि उपनगरातील कनेक्टिव्हिटीला नवी दिशा देणारा ठरेल. मुंबई मेट्रोच्या नेटवर्क विस्ताराचा एक आवश्यक भाग म्हणून विमानतळ ते विमानतळ कनेक्टिव्हिटीला मान्यता देण्यात आली. लवकरच नवी मुंबई विमानतळ सुरू होणार आहे, पण या ठिकाणी सध्या वाहतूक सुविधा उपलब्ध नाहीत. या मेट्रो प्रजोक्टचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे. दोन विमानतळातील अंतर फक्त ३० मिनिटांत पूर्ण होणार आहे.
सध्या या प्रवासासाठी १२० मिनिटांचा वेळ लागतो. दोन आंतरराष्ट्रीय विमानतळे पहिल्यांदाच मेट्रोने जोडली जाणार आहेत. मेट्रो कनेक्टिव्हिटीमुळे प्रवास अतिशय वेगात होणार आहे. वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही. वाढत्या लोकसंख्येच्या दबावामुळे सार्वजनिक वाहतुकीला मोठी चालना मिळेल आणि व्यावसायिक प्रवाशांसाठी आणि आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी सोय होईल.