मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी बांधकामे व शासकीय प्रकल्पांवर यापुढेही कारवाई सुरूच राहणार
मुंबई : मुंबईतील वाऱ्याच्या वेगातही आता सुधारणा झाली आहे. या सर्वसमावेशक कारणांमुळे मुंबईतील वायू गुणवत्ता निर्देशांकात (एक्यूआय) २६ नोव्हेंबर २०२५ पासून सातत्याने सुधारणा होत असून मागील ४८ तासांत लक्षणीय सुधारणा आढळली आहे. महानगरपालिकेने जारी केलेल्या २८ मुद्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन होईल, यावर भर दिला जात आहे. यासाठी विविध बांधकामांना ‘कामे थांबवा’ नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी, शासकीय, अशासकीय प्रकल्पांवर यापुढेही कारवाई सुरूच ठेवावी, असे सक्त निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. तसेच, ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन स्टेज-४ (ग्रॅप-४) मुंबईसाठी सध्या लागू नाही. मात्र, संनियंत्रणासंदर्भात (मॉनिटरिंग) निर्देश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी म्हणाले की, मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिकेकडून प्रभावीपणे उपायोजना केल्या जात आहेत. यामध्ये बेकरी तसेच स्मशानभूमीचे स्वच्छ इंधनावर परिवर्तन, धूळ आटोक्यात आणण्यासाठी मिस्टींग मशीनच्या सहाय्याने फवारणी, पाण्याने रस्ते धुऊन काढणे आणि विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन, नागरिकांमध्ये जनजागृती यासह विविध उपाययोजनांचा समावेश आहे. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेने २८ मुद्यांचा समावेश असलेली सर्वंकष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचे काटकोरपणे पालन व्हावे, यासाठी महानगरपालिकेकडून सर्व प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर एकूण ९४ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांनी खासगी प्रकल्पांसह रस्ते, मेट्रो आदी शासकीय प्रकल्पांची पाहणी करत मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांना नोटीस बजावल्या आहेत. बांधकाम स्थळी संवेदक (सेन्सॉर) आधारित वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) मोजणारे संयंत्र कार्यान्वित राहतील, याची पाहणीसुद्धा या पथकाकडून सुरू आहे. मुंबई बंदर प्राधिकरण परिसरात पेटवल्या जाणाऱ्या शेकोट्या बंद करण्याच्या सूचनेला संबंधित यंत्रणेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, असेही गगराणी यांनी नमूद केले.
महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या विविध उपाययोजनांमुळे २६ नोव्हेंबर २०२५ पासून मुंबईतील वायू गुणवत्ता निर्देशांकात (एक्यूआय) सातत्याने सुधारणा दिसून येत आहे. तसेच, २८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी वाऱ्याचा वेग ताशी ३ ते ४ किलोमीटर होता तसेच वातावरणात आर्द्रता होती. मात्र, आता त्यात सुधारणा होऊन वाऱ्याचा वेग ताशी १० ते १८ किलोमीटरपर्यंत पोहोचला आहे. परिणामी, वायू गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा होत आहे.