माँ नर्मदा... एक अध्यात्मिक परिक्रमा!!

मनाचा गाभारा : अर्चना सरोदे


त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे!!


आजच्या भागात आपण नर्मदा परिक्रमा कोणकोणत्या प्रकारे करता येते हे जाणून घेणार आहोत. खरं सांगायचं झालं तर मला पण नर्मदा परिक्रमा करायची आहे किंवा मी नर्मदा परिक्रमा करणार आहे असं म्हटलं आणि लगेच आपण परिक्रमेला निघालो किंवा परिक्रमा केली असं होतं नाही, तर त्यासाठी तुम्हाला ती इच्छा मनापासून व्हायला हवी. तुमच्या मनाच्या गाभाऱ्यातून जेव्हा ही इच्छा ध्वनी निघते ती मय्याने ऐकायला हवी, त्यासाठीची तुमची जी तळमळ असते ती मय्यापर्यंत पोहोचायला हवी. कारणं जोपर्यंत मय्याला भेटण्याची ओढ मय्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तिचं बोलावणं तुम्हाला येत नाही आणि जोपर्यंत तिचं बोलावणं येतं नाही तोपर्यंत तुम्ही परिक्रमेला जाऊ शकत नाही. मग तुम्ही कितीही ठरवलं तरी या ना त्या कारणाने ते लांबणीवर पडतं. असो. दुसरं म्हणजे तुमच्या मनात समर्पित भाव असायला हवा. तुम्ही स्वतःला जेव्हा तिच्या चरणी समर्पित करता तेव्हा तिची तुमच्यावर भरभरून कृपा होते.


नर्मदा मय्याची परिक्रमा कोणकोणत्या प्रकारे करता येते ते बघूया. पहिल्या प्रकारात तुम्ही ही परिक्रमा अमरकंटक, ओंकारेश्वर, नेमावर किंवा अन्य कोणत्याही घाटापासून उचलू शकता. तसं बघायला गेलं तर अमरकंटक हे मय्याचे उद्गम स्थान असल्याने खरी परिक्रमेची सुरुवात तिथूनच करतात; परंतु अमरकंटक ते अमरकंटक परिक्रमा केल्यानंतर जल अर्पण करायला पुन्हा ओंकारेश्वरला यावे लागत असल्याने सोयीस्करदृष्ट्या बहुतेक जण ओंकारेश्वराहून परिक्रमा सुरू करतात आणि तिथेच संकल्प सोडून परिक्रमा पूर्ण करतात. तुम्हाला नर्मदा मैय्याला न ओलांडता संपूर्ण परिक्रमा पूर्ण करावी लागते. तुम्हाला ओंकारेश्वर दक्षिण तट इथून परिक्रमा सुरु केल्यावर मिठीतलाई वरुन समुद्र तट परिवर्तन करुन परत उत्तर तटावर ओंकारेश्वर इथेच परिक्रमा पूर्ण करावी लागते. या परिक्रमे दरम्यान तुम्ही जर नर्मदा मय्याला ओलांडून परिक्रमा केलीत तर तुमची परिक्रमा खंडित होते.


दुसरा प्रकार म्हणजे जलहरी परिक्रमा. जलहरी परिक्रमा ही दोन्ही तटांची दोन वर्तुळात केली जाते. ती सामान्यतः अमरकंटकपासून सुरू होते. जलहरी परिक्रमा करणारे बहुतेक लोक अमरकंटकपासून सुरुवात करतात. या परिक्रमेत प्रथम अमरकंटकपासून सुरुवात करून दक्षिण तीरावरून अमरकंटकहून विमलेश्वरपर्यंत किनाऱ्याने पुढे जातात; परंतु समुद्र ओलांडत नाहीत आणि तिथून परत अमरकंटकला परत येतात. त्यानंतर अमरकंटकहून उत्तरतटावर समुद्राकडे जाऊन नंतर मिठी तलाई मार्गे अमरकंटकला परत येतात. तेव्हा सुद्धा समुद्र ओलांडत नाहीत. ही प्रदक्षिणा दोनदा पूर्ण होते. याला जलहरी परिक्रमा म्हणतात.


तिसरा प्रकार म्हणजे खंड परिक्रमा. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना वेळेअभावी परिक्रमा करता नाही येत. म्हणून यात तुमच्या वेळेनुसार किंवा सुट्टीनुसार तुम्ही ही परिक्रमा करू शकता. अगदी आठ, पंधरा दिवस किंवा महिनाभर सुट्टी काढून तुम्ही ही परिक्रमा करून परत कामावर जाऊ शकता. त्यानंतर, जेव्हा जेव्हा तुम्हाला सुट्टी मिळेल तेव्हा तुम्ही जिथे परिक्रमा अर्धवट सोडली होती तिथून परत तेवढ्या दिवसांसाठी पुढे ती परिक्रमा सुरू करू शकता. ही परिक्रमा टप्प्याटप्प्यात होते, म्हणूनच या परिक्रमेला ‘खंड परिक्रमा’ असे नाव पडले आहे.


नर्मदा परिक्रमेच्या उप परिक्रमासुद्धा आहेत. पंचक्रोशी आणि उत्तरवाहिनी परिक्रमा. पंचक्रोशी यात्रेबद्दल बोलायचे झाले, तर वेगवेगळ्या ठिकाणी अनेक पंचक्रोशी आहेत. प्रत्येक ठिकाणची वेगळी पंचक्रोशी आहे. उदाहरणार्थ, अमरकंटकला वेगळी पंचक्रोशी आहे, दिंडोरीला वेगळी पंचक्रोशी आहे, मंडाला येथे वेगळी पंचक्रोशी आहे आणि जबलपूरला वेगळी पंचक्रोशी आहे. पंचक्रोशी यात्रा वेगवेगळ्या पंचक्रोशी प्रदेशांमध्ये आयोजित केली जाते. ही यात्रा पाच दिवसांची असते. विशेष म्हणजे ती एकादशीला सुरू होते आणि पाच दिवसांनी पौर्णिमेला किंवा अमावस्येला संपते. यामध्ये दररोज ५ गाव ५ दिवसांत चालणे व २५ कोस अंतर पार करणे समाविष्ट आहे. ही एक छोटीशी यात्रा असते आणि साधारणपणे अशी मान्यता आहे की, ज्यांना नर्मदा मय्याची मोठी परिक्रमा करता येत नाही ते पंचक्रोशी परिक्रमा करतात. उत्तर वाहिनी परिक्रमा ही एक किंवा दोन दिवसांची असते. जरी नर्मदा सामान्यतः पश्चिमेकडे वाहते, तरी काही ठिकाणी ती सर्व दिशांना वाहते. अंदाजे पाच ते सहा ठिकाणी नर्मदा उत्तरेकडे अनेक किलोमीटर वाहते. शास्त्रांमध्ये असे नमूद आहे की, उत्तरेकडे वाहत जाणारी नर्मदा नदी एका काठापासून ५ कोसापेक्षा जास्त अंतरावर वाहते. उत्तरेकडे वाहून जाणारी नर्मदा नदी तीन ठिकाणी प्रवास करू शकते. यापैकी एक ठिकाण मंडाला येथील व्यास नारायणपासून संपूर्ण अंतरावर पसरलेले आहे. दुसरे ठिकाण नर्मदा बांध प्रकल्पात पाण्याखालचा भाग म्हणून घोषित केले आहे आणि तिसरे ठिकाण हे गुजरातमधील तिलकवाडा येथे आहे, जिथे उत्तरवाहिनी यात्रा केली जाते. टिळकवाड्यातील उत्तरवाहिनी यात्रा सर्वात प्रसिद्ध आहे. उत्तरवाहिनी यात्रा चैत्र महिन्यात केली जाते. असे मानले जाते की, उत्तरवाहिनी नर्मदा नदीला परिक्रमा केल्याने पूर्ण प्रदक्षिणा केल्यासारखेच पुण्य मिळते. चैत्र महिन्यात, गुजरातमधील तिलकवाडा येथे लाखो लोक उत्तरवाहिनी परिक्रमा करण्यासाठी जमतात. गेल्या चार वर्षांपासून मंडाला येथे उत्तरवाहिनी परिक्रमा आयोजित केली जात आहे. गेल्या ४ वर्षांपासून मांडला येथे उत्तरवाहिनी परिक्रमा सुरू झाली आहे. कारण यावर्षी सुमारे १४ ते १५ राज्यांमधून, सुमारे २५०० ते ३००० लोक मोठ्या संख्येने मांडला येथे आले होते. ज्यांनी उत्तरवाहिनी परिक्रमा केली आहे. ती चैत्र महिन्यात दोन दिवसांत होते. मंडालापासूनचा उत्तरवाहिनी परिक्रमा मार्ग ३९ किलोमीटर आहे. एकाच दिवसात पार करणे शक्य नाही म्हणून ते दोन दिवसांत पूर्ण केले जाते. गुजरातच्या रामपुरापासून तिलकवाड्यापर्यंत उत्तरवाहिनी परिक्रमेचे अंतर २२ कि.मी. आहे, तर अशा प्रकारे नर्मदा नदीची परिक्रमा आपण करू शकतो.
नर्मदे हर... नर्मदे हर... नर्मदे हर

Comments
Add Comment

ज्ञानाचे मर्म

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै  सगळ्या ठिकाणी ज्ञान हे कार्य करते व त्याच्याच वापरांतून प्रयोगांतून मिळणारे

चित्ताची एकाग्रता

आत्मज्ञान : प्राची परचुरे - वैद्य आजच्या तंत्रज्ञानप्रधान धावपळीच्या युगात माणसाचे चित्त खूपच अस्थिर झाले आहे.

महर्षी भारद्वाज

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी आपल्या देदिप्यमान तेजाने आसमंतात अखंड झळकणाऱ्या सप्तर्षींपैकी एक ऋषी म्हणजे

उत्पन्ना एकादशीचे महत्त्व आणि पाळा हे नियम! जाणून घ्या सविस्तर...

दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास आणि व्रत केले जाते. प्रत्येक एकादशीला विशिष्ट असे

कधी आहे कालभैरव जयंती? महत्त्व काय? जाणून घ्या सविस्तर

दरवर्षी, मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या भगवान कालभैरव

परमेश्वर हाच आपल्या जीवनाचा पाया

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै  परमेश्वर हा विषय समजला नाही, तर हे जग सुखी होणे शक्य नाही, हा जीवनविद्येचा