नवी दिल्ली : लाल किल्ला परिसरातील बॉम्बस्फोट प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे सरकत आहे, तसतसे नवनवीन आणि धक्कादायक तपशील समोर येत आहेत. गुप्तचर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने पाच टप्प्यांमध्ये संपूर्ण दहशतवादी हल्ल्याचा आराखडा तयार केला होता. या कटात आर्थिक मदत गोळा करणे, स्फोटक साहित्य मिळवणे आणि लक्ष्य निश्चित करणे या सर्व बाबींचा बारकाईने विचार करण्यात आला होता.
चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सुमारे ३ लाख रुपयांत एनपीके प्रकारचे स्फोटक साहित्य खरेदी केले होते, तर संपूर्ण मालिकेतील हल्ल्यांसाठी २६ लाख रुपये जमा करण्यात आले होते. ही रक्कम डॉ. मुझम्मिल, डॉ. आदिल, डॉ. उमर आणि डॉ. शाहीन यांनी एकत्रितपणे उभारली होती. संपूर्ण निधी उमरच्या ताब्यात देण्यात आला होता.
६ डिसेंबर रोजी झालेल्या सहा ठिकाणच्या बॉम्बस्फोटांनी दिल्ली आणि परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर या कटाचा पर्दाफाश झाला.
जैशच्या या गटाचे केंद्रस्थान अल फलाह विद्यापीठातील इमारत क्रमांक १७ मधील खोली क्रमांक १३ हे ठरले होते. या खोलीतच मुझम्मिल, आदिल, उमर, शाहीन आणि त्यांच्या साथीदारांची बैठक होत असे. याच ठिकाणी मुझम्मिलने दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला.
विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून विविध रसायनांची चोरी करून ती मुझम्मिलच्या खोलीत आणण्यात आली. त्यानंतर ही रसायने फरीदाबादमधील धौज आणि टागा गावात नेऊन, अमोनियम नायट्रेटसह इतर रसायनांचा वापर करून स्फोटके तयार करण्यात आली.
चौकशीत आणखी एक महत्वाचा धागा सापडला आहे. जैशचा प्रमुख मसूद अझहरचा पुतण्या उमर फारूकची पत्नी आफिरा आणि डॉ. शाहीन यांच्यात घनिष्ठ संपर्क असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच मसूद अझहरची बहीण सादिया आणि आफिराच्या सांगण्यावरून शाहीन भारतात जैशची महिला शाखा स्थापन करण्याच्या प्रयत्नात असल्याचाही खुलासा झाला आहे.
डायरीतून उघड झाले कोडवर्ड आणि प्लॅन
दहशतवादी उमरकडून मिळालेल्या गुप्त डायरीत “ऑपरेशन” हा कोडवर्ड सापडला असून, त्यात स्फोटकांचा साठा, हल्ल्याची स्थळे, प्रत्येक सदस्याची जबाबदारी आणि हल्ल्याची तारीख यासंबंधी तपशीलवार नोंदी सापडल्या आहेत. धौजमधील मुझम्मिलच्या ठिकाणावरूनही एक डायरी जप्त करण्यात आली असून, त्यातून हल्ल्याशी संबंधित आणखी महत्त्वाची माहिती मिळाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
या सर्व घटनेमुळे जैश-ए-मोहम्मदच्या भारतातील गुप्त हालचालींचं जाळं पुन्हा एकदा समोर आलं असून, तपास यंत्रणा आता या प्रकरणातील स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचा शोध घेत आहे.