ऑस्ट्रेलिया : मनुका ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा पहिला टी२० सामना अखेर सततच्या पावसामुळे रद्द करण्यात आला. भारताने दमदार सुरुवात करताना १० षटकांत फक्त १ विकेट गमावून ९७ धावा केल्या होत्या, मात्र त्यानंतर पावसाने पुन्हा मैदानावर हजेरी लावली आणि सामना पुढे सुरू होऊ शकला नाही.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि सलामीवीर शुभमन गिल यांनी प्रभावी कामारी केली. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी ३५ चेंडूत ६२ धावा जोडल्या. सूर्यकुमारने आक्रमक फलंदाजी करत २४ चेंडूत ३९ धावा, तर गिलने आकर्षक फटकेबाजीसह २० चेंडूत ३७ धावा काढल्या. त्यांच्या या भागीदारीमुळे भारताने ऑस्ट्रेलियावर सुरुवातीपासूनच दबाव निर्माण केला होता.
त्याआधी, युवा फलंदाज अभिषेक शर्माने चार चौकारांसह १४ चेंडूत १९ धावा केल्या, पण तो नाथन एलिसच्या गोलंदाजीवर बाद झाला. विकेट गमावल्यानंतरही भारताने आक्रमक खेळ कायम ठेवत फलंदाजीवर नियंत्रण मिळवले होते.
पावसामुळे सामन्याच्या सुरुवातीला खेळ उशिरा सुरू झाला आणि सामना २० ऐवजी १८ षटकांपर्यंत मर्यादित करण्यात आला होता. मात्र हवामान पुन्हा बिघडल्याने खेळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता, परंतु भारतीय फलंदाजांनी त्यांच्या गोलंदाजांना कोणताही वाव दिला नाही.
सूर्यकुमार आणि गिलच्या जबरदस्त फटकेबाजीने भारताने मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती, पण अखेर पावसाने सामन्याचा रंग उडवला. भारताने मिळवलेली उत्कृष्ट सुरुवात व्यर्थ ठरली, आता दोन्ही संघांना मालिकेतील पुढील सामन्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी२० सामना शुक्रवार ३१ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी १:४५ वाजता सुरू होईल.