मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या तानसा धरणावर आता वीज निर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे. या धरणातील पाण्यावर १०० मेगावॉट क्षमतेचा भव्य सौर ऊर्जा प्रकल्प असून महापालिकेला एकाही पैसा खर्च करावा लागणार नाही. महाप्रीतच्या वतीने हा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याने निर्मित होणाऱ्या प्रकल्पातील विजेचा वापर करण्यात येणार असल्याने महापालिकेचा विजेवर होणाऱ्या खर्चा पैकी १५७ कोटी रुपयांची बचत होणार आहे.
तानसा धरणातील पाण्यावर उभारण्यात येणारा हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी न घेण्यात आला आहे. महात्मा फुले रिन्यूएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड ( - महाप्रित) च्या वतीने हा प्रकल्प साकारला जाणार आहे. तानसा धरणातील या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी पाण्यावर पॅनेल उभारून त्याद्वारे वीज निर्मिती केली जाणार आहे. हा प्रकल्प २५ वर्षांकरता या संस्थेमार्फत केला जाणार आहे. या प्रकल्पातून उपलब्ध होणारी वीज ही महापालिकेला ४.२५ रुपये प्रति युनिट दराने मिळणार आहे. महापालिकेच्या अंदाजानुसार, यामुळे भविष्यात एका वर्षात तब्बल १६५ कोटी रुपयांची मोठी बचत होणार आहे. सध्याच्या वीज दराच्या तुलनेत हा दर अत्यंत कमी असल्याने महापालिकेला हा मोठा दिलासा मिळणार आहे.
हा प्रकल्प केवळ मुंबई महापालिकेच्या पैशांची बचत करणार नाही, तर शहराला स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा पुरवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरणार आहे. मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी वीज महत्त्वाची असते आणि आता ही वीज थेट धरणावरच निर्माण होणार असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वपूर्ण असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे यासाठी महापालिकेचा एकही पैसा खर्च होणार नाही.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये:
क्षमता: १०० मेगावॉट वीज निर्मिती
संस्थेचे नाव: महाप्रित
वीज खरेदी दर: ४.२५ रुपये प्रति युनिट
अपेक्षित बचत: १६५ कोटी रुपये