भारताने युद्धासारख्या परिस्थितीसाठी सज्ज राहावे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली : मे महिन्यात पाकिस्तानसोबत झालेल्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर भारताने युद्धासारख्या कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज राहणे आवश्यक असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी सांगितले. ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, या ऑपरेशनदरम्यान भारताने पाकिस्तानला करारा प्रत्युत्तर दिले असून, हे ऑपरेशन भविष्यातील राष्ट्रीय सुरक्षेच्या आराखड्यासाठी एक महत्त्वाचे केस स्टडी ठरेल.


सिंह म्हणाले की, ७ ते १० मेदरम्यान झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये स्वदेशी बनावटीच्या लष्करी उपकरणांच्या प्रभावी वापरामुळे भारताची प्रतिष्ठा प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढली आहे. त्यांनी चेतावणी दिली की, “ऑपरेशन सिंदूरनंतर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जिथे युद्ध आपल्या दारावर ठोठावत आहे. आपण सज्ज आहोत, परंतु आत्मपरीक्षणाची गरज आहे.”


संरक्षणमंत्र्यांनी पुढे सांगितले की, या घटनेने भारताला पुन्हा एकदा जागरूक केले आहे की सीमेवर कुठल्याही क्षणी काहीही घडू शकते. म्हणूनच, देशाने युद्धासारख्या परिस्थितीसाठी स्वतःच्या तंत्रज्ञान आणि क्षमतेवर आधारित तयारी ठेवली पाहिजे. त्यांनी स्वदेशीकरणावर भर देताना सांगितले की, जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक क्षेत्राचे सखोल मूल्यांकन आवश्यक आहे आणि आत्मनिर्भरता हाच सुरक्षिततेचा मार्ग आहे.


सिंह म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान जगाने भारताच्या आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, ब्रह्मोस आणि आकाशतीर हवाई संरक्षण प्रणालीची ताकद पाहिली. या यशाचे श्रेय सशस्त्र दलांसोबतच नाविन्यपूर्ण उत्पादन क्षेत्रातील “उद्योग योद्ध्यांनाही” जाते. त्यांनी भारतीय उद्योगाला संरक्षण क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा स्तंभ म्हटले आणि सांगितले की सरकार संरक्षण उत्पादन वाढवण्यासाठी समान संधी उपलब्ध करून देत आहे.


राजनाथ सिंह यांनी सांगितले की, २०१४ पूर्वी भारत आपल्या सुरक्षेच्या गरजांसाठी आयातीवर अवलंबून होता, मात्र आज देश स्वतःच्या भूमीवर अत्याधुनिक उपकरणे तयार करत आहे. त्यांनी सांगितले की, “२०१४ मध्ये संरक्षण उत्पादन केवळ ४६,००० कोटी रुपये होते, ते आता १.५१ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे, ज्यापैकी ३३,००० कोटी रुपये खाजगी क्षेत्राचे आहेत. तर संरक्षण निर्यात १,००० कोटी रुपयांवरून २४,००० कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे आणि मार्च २०२६ पर्यंत ती ३०,००० कोटी रुपयांवर पोहोचेल.”


त्यांनी उद्योगांना पुरवठा साखळीवर प्रभुत्व मिळवण्याचे आणि उपप्रणालींच्या स्वदेशी उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. “आपली माती, आपले कवच” ही भावना बळकट करत त्यांनी सांगितले की, उद्दिष्ट फक्त भारतात असेंबल करणे नसून तंत्रज्ञानावर आधारित स्वदेशी उत्पादन उभारणे असले पाहिजे.


सिंह म्हणाले की, कोणतेही तंत्रज्ञान हस्तांतरण केवळ उत्पादनापुरते मर्यादित न राहता भारतीय उद्योगांना सक्षम बनवणारे असले पाहिजे. नवोपक्रम आणि संशोधनासाठी क्वांटम मिशन, अटल इनोव्हेशन मिशन आणि नॅशनल रिसर्च फाउंडेशनसारखे उपक्रम यासाठी प्रभावी ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.


या सर्व प्रयत्नांमुळे भारत आता ‘मेड इन इंडिया, मेड फॉर द वर्ल्ड’ या संकल्पनेला मूर्त रूप देत जागतिक स्तरावर आपले संरक्षण सामर्थ्य प्रस्थापित करत आहे, असे सिंह यांनी ठामपणे नमूद केले.

Comments
Add Comment

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी

India Nepal Flood Relief Operation : नेपाळच्या पूरस्थितीत भारताची मदतकार्य मोहीम तीव्र; १०८ भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी भोटेकोशी परिसरात आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

Nepal Flood : नेपाळमध्ये महापुराचा कहर! ६ जलविद्युत प्रकल्पांमध्ये ५०० हून अधिक जण अडकले; बचावकार्याला खराब हवामानाचा अडथळा

डेहराडून : नेपाळमध्ये आलेल्या भीषण आणि विनाशकारी पुरानंतर परिस्थिती अद्याप गंभीर आहे. फ्लॅश फ्लडचा सर्वाधिक