दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण!
सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटण, सातारा येथे 'कृतज्ञता मेळावा' येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण केले. या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक भूमीत मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विकासकामांचा आढावा घेत, मुख्यमंत्री फडणवीस यांनी फलटण आणि माणदेश भागातील सर्वांगीण प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निरा देवघर प्रकल्पाचे दोन्ही टप्पे फलटण आणि माळशिरस या दुष्काळी भागासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. पूर्वीच्या काळात विविध कारणांमुळे हे पाणी फलटण व माळशिरसपर्यंत पोहोचू शकले नव्हते, परंतु आज सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे स्वप्न साकार होत आहे. या प्रकल्पाद्वारे माणदेशातील दुष्काळ संपुष्टात येऊन हरित माणदेश उभारण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. जिहे-कठापूर, टेंभू, तसेच सांगोला भागातील उपसा सिंचन प्रकल्पांद्वारेही या प्रदेशात नवे विकासाचे क्षितिज उघडले जात आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फलटण येथे प्रशासकीय आणि पोलीस विभागाच्या आधुनिक इमारतींचे भूमिपूजन करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नवे रस्ते, न्यायालयीन इमारती, औद्योगिक प्रकल्प, यंत्र सामुग्रीने सुसज्ज अशा रुग्णालयाची निर्मिती, तसेच पाण्याच्या उपलब्धतेसाठीच्या योजनांवर तातडीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. माळशिरस तालुक्यातील २२ गावांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी टेंडर प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल, तसेच निरा देवघर उपसा सिंचन योजनेतील गावडेवाडी, शेखमीरवाडी आणि वाघोशी या योजनांनाही मंजुरी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पाडेगाव - साखरवाडी - जिंती - फलटण - शिंगणापूर रस्ता करण्यात येईल. फलटण-शिंगणापूर रस्त्यावरील नाईकबंबवाडी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीमध्ये मेगा औद्योगिक प्रकल्प देण्यासह तालुका व परिसरातील विविध विकास कामे सुरू करण्यात येतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. फलटण येथे न्यायालयासाठी स्वतंत्र इमारत उभारण्यात येईल तसेच फलटण येथील विमानतळाच्या अनुषंगाने सर्वेक्षण करण्यात येऊन काम शक्य असल्यास करण्यात येईल. त्याचबरोबर फलटण येथील रुग्णालयातील सुविधा अद्ययावत करण्यात येतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आमचे सरकार हे विकासाचा विचार करणारे सरकार आहे. राज्यातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास आणि शेतकऱ्यांचे हित हे आमचे प्राधान्य आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर संकट आल्यानंतर इतिहासातील सर्वात मोठे ₹३२,००० कोटींचे पॅकेज देण्यात आले आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचत नाही, तोपर्यंत आमचे प्रयत्न सुरू राहतील, असा निर्धार मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी मंत्री शंभूराज देसाई, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.