मुंबई: पावसाळ्यानंतर आता पुणेसह संपूर्ण महाराष्ट्रात 'ऑक्टोबर हिट'ने जोर धरला आहे. दिवसा कडक उन्हाळा आणि रात्री अचानक गारठा जाणवल्यामुळे वातावरणात तीव्र चढ-उतार होत आहेत. या अचानक बदलत्या हवामानामुळे नागरिकांना सर्दी, ताप, खोकला आणि डोकेदुखीसारखे संसर्गजन्य आजार वाढले आहेत.
ऑक्टोबर हिटमुळे आजार वाढले
सध्या दिवाळीच्या खरेदीच्या गर्दीमुळे बाजारपेठा गजबजलेल्या आहेत. या गर्दीतून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संसर्गाचा धोका वाढतो आणि रुग्णांची संख्या लवकर वाढू लागली आहे. त्यामुळे दवाखान्यांमध्येही रुग्णांची गर्दी वाढत असून, वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
ऑक्टोबर हिटमुळे वातावरणात दिसणारी लक्षणेही विशेष आहेत. दिवसा तीव्र उष्णता जाणवते, संध्याकाळी थोडा गारवा निर्माण होतो, तर रात्री थंडीचा कडाका जाणवतो. पहाटे धुक्याचा फटका आणि थंडीची तीव्रता अधिक जाणवते, मात्र सूर्योदयानंतर लगेचच उन्हाचा प्रकोप सुरु होतो. या तीव्र चढ-उतारामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
आरोग्याची कशी घ्याल काळजी?
- शक्यतो फ्रीजमधील पाणी आणि आईस्क्रीम टाळावे.
- पाणी उकळून प्यावे.
- तळलेले पदार्थ खाणे कमी करावे.
- बाहेर फिरताना नाक आणि तोंडाला रुमाल बांधावा.
- दुचाकीवर प्रवास करताना देखील नाक-तोंडाचे रक्षण करणे गरजेचे आहे.
या साध्या खबरदारीने ऑक्टोबर हिटच्या बदलत्या हवामानातून निर्माण होणाऱ्या आजारांपासून बचाव करता येईल.