मुंबई : नटरंग हा मराठी चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली. चित्रपटातील गाणी आणि लावणी याची आजही प्रेक्षकांना भुरळ पडते. नटरंग चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधवने केले होते आणि निर्मिती झी स्टुडिओजची होती. या अभूतपूर्व यशाला १५ वर्षे पूर्ण होत असतानाच नव्या चित्रपटाची तयारी सुरू झाली आहे. दिग्दर्शक रवी जाधव आणि त्यांची टीम २०२६ मध्ये एक नवा चित्रपट घेऊन येत आहे. 'फुलवरा' असे या चित्रपटाचे नाव आहे. रवी जाधव यांनी सोशल मीडियातून नव्या चित्रपटाची घोषणा केली. नव्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
तमाशा फडावरचे कलाकार मंचावर येऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. पण त्यांचं खरं आयुष्य हे पडद्यामागे आहे आणि ते अतिशय अस्वस्थ करणारे असे आहे. यावर प्रकाश टाकणारे 'द फोक आख्यान' हा लोककलाविष्कार बघितला. त्या सादरीकरणाने भारावलेल्या रवी जाधव यांनी याच विषयावर चित्रपट निर्मिती करण्याचा विचार सुरू केला, त्यातूनच 'फुलवरा' हा चित्रपट जन्माला आला.
'द फोक आख्यान' या बद्दल बोलताना रवी जाधव म्हणाले, हे ज्याच्या लेखन आणि निवेदनांन सजलं आहे त्या ईश्वर अंधारेचा या विषयावरचा अभ्यास हा थक्क करणारा आहे. आणि हर्ष- विजय या तरुण जोडगोळीला असलेली संगीताची जाण ही सुद्धा कौतुकास्पद आहे. या तरुणांची लोककलेवरची श्रद्धा, माझं या कलेप्रती असलेलं प्रेम आणि गाठीशी असलेला थोडाफार अनुभव एकत्र आला आणि फुलवराची गोष्ट निर्माण झाली. अश्या प्रकारची गोष्ट जर लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर झी स्टुडिओज पेक्षा दुसरं उत्तम माध्यम नाही. त्यामुळे आम्ही नटरंग नंतर जवळपास १५ वर्षांनी एकत्र काम करणार आहोत. दिवाळी हा सण परंपरा जपणारा आहे, साजरा करणारा आहे त्यामुळे या दिवाळीचा शुभ मुहूर्त साधून आम्ही या सिनेमाची घोषणा केली.
'फुलवरा' या चित्रपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन रवी जाधव यांचे असून कथा - पटकथा आणि संवाद, गाणी ही ईश्वर ताराबाई अंधारे यांचे आहेत. संगीत हर्ष - विजय यांचं असून निर्मिती उमेशकुमार बन्सल, बवेश जानवेलकर ( झी स्टुडिओज) आणि मेघना जाधव ( अथांग कॉम्युनिकेशन ) यांची आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत कोणते कलाकार असतील हि गोष्ट अद्याप गुलदस्त्यात आहे आणि ही गोष्ट जाणून घेण्यात प्रेक्षक उत्सुक आहेत. पुढल्या वर्षीच्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे