अलिबाग : शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्याबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत रात्रीचा दिवस काम करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील आशासेविका सध्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत. जून महिन्यांपासून त्यांना शासनाकडून मानधनच मिळालेले नाही. शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांची आशा सेविकांनी भेट घेतली असता, आशासेविकांच्या पाठिशी शेकाप कायम असून, चार दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील पत्रकार परिषदेत दिला.
अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे शासन शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्यास अपयशी ठरत असल्याने शासनाने ग्रामीण भागात स्थानिक महिलांची मदत घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी आशासेविका पद नियुक्त करण्यात आले. रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास दीड हजारहून अधिक आशासेविका आहेत. आशा सेविकांच्या मदतीने शासनाच्या योजना घराघरात पोहचविणे, आपत्कालीन परिस्थितीत मदतीचा हात देणे, माता, बाल मृत्यूचे प्रमाण टाळणे, बालक व मातेचे आरोग्य राखण्याबरोबरच जन्म, मृत्यूची नोंद ठेवणे, बालकांसह मातांचे लसीकरण करणे. गावांतील प्रसूत महिलेला दवाखान्यात नेण्यापासून ते त्यांचे आरोग्य राखण्यासाठी सहकार्य करण्याचे काम आशासेविका भगिनी करतात. कृष्ठरोग व इतर साथीच्या आजारांवर उपाय करण्यासाठी अंमलबजावणी करणे, जनजागृती करणे, आयुष्यमान, आभाकार्ड काढण्यासाठी गावागावात प्रचार व प्रसार करण्याचे कामही आशासेविका करीत असतात.
राज्य शासनासह केंद्र शासनाच्या योजनांची कामे आशासेविकांमार्फत केली जातात. केंद्राचे काम केल्यास राज्य शासनाकडून त्यांना दर महिन्याला मानधन दिले जाते, परंतु गेल्या जून महिन्यापासून आशा सेविकांना मानधनच देण्यास सरकार उदासीन ठरले आहे. गणेशोत्साबरोबरच नवरात्रौत्सव सण मानधनाविनाच गेला. दिवाळी सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे, तरीदेखील मानधन देण्यास शासनाकडून कोणत्याही हालचाली सुरु झाल्या नाहीत. त्यामुळे आशा सेविकांनी शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांची शेकाप भवन येथे भेट घेतली आणि त्यांच्यापुढे समस्यांचा पाडाच त्यांनी वाचून दाखविला. त्यामुळे आशासेविकांच्या या प्रश्नांबाबत चित्रलेखा पाटील आक्रमक झाल्या आहेत. सरकारच्या या भुमिकेबाबत संताप व्यक्त करीत चार दिवसात आशा सेविकांच्या मागण्यापूर्ण करा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा पत्रकार परिषदेत त्यांनी दिला.