महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे प्रत्यक्ष पाहणी दौ-यादरम्यान निर्देश
मुंबई (खास प्रतिनिधी) : अंधेरी - घाटकोपर जोड मार्गावर 'महारेल'च्या माध्यमातून रेल्वे मार्गावर उड्डाणपूल उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. पूल बांधणीचा कालावधी वाढू नये आणि नागरिकांना कोणतीही असुविधा होऊ नये, याची विशेष दक्षता घ्यावी. बांधकामांची ठोस कालमर्यादा निश्चित करावी. रस्ता रूंदीकरण, पूल प्रकल्पामुळे बाधित होणा-या पात्र निवासी तथा अनिवासी बाधितांची विगतवारी करावी. त्याचे तातडीने पुनर्वसन करावे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) यांच्याशी समन्वय साधून प्राधान्याने पुनर्वसन कार्य हाती घ्यावे. बाधितांचे टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करून पुलाच्या कामाला गती द्यावी अशाप्रकारे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र रेल इन्फास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन (महारेल) यांच्या वतीने अंधेरी - घाटकोपर जोड मार्गावर उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. रेल्वेमार्गावर उभारण्यात येणा-या या पूलाचे काम 'महारेल' करत आहे. मुंबई महानगरपालिका अर्थसहाय्य करत आहे. केबलस्टेड रचना आधारीत असलेल्या या पुलाचे बांधकाम दोन टप्प्यात केले जाणार आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी गुरूवारी ९ ऑक्टोबर २०२५ पहिल्या टप्प्यात सुरू असलेल्या बांधकामाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
स्थानिक आमदार राम कदम, स्थानिक आमदार पराग शहा, 'महारेल'चे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जैस्वाल, महानगरपालिका उपायुक्त (परिमंडळ ६) संतोषकुमार धोंडे, सहायक आयुक्त (एन विभाग) डॉ. गजानन बेल्लाळे, प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळ्ये यांच्यासह संबंधित अधिकारी - अभियंते यावेळी उपस्थित होते.
या उड्डाणपुलामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस असणारी निवासी आणि अनिवासी बांधकामे बाधित होत आहेत. पात्र प्रकल्प बाधित नागरिकांचे तातडीने पुनर्वसन करावे व पुलाच्या बांधकामाला गती द्यावी. रेल्वेमार्गावरील विद्यमान उड्डाणपुलाचे संरचनात्मक लेखापरीक्षण करावे. वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून अवजड वाहनांना तात्पुरती मनाई करावी, असे विविध निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी गुरुवारी ९ ऑक्टोबर २०२५ रोजी दिले. विविध उपयोगिता वाहिन्यांचे नियोजनपूर्वक स्थलांतरण करावे. रेल्वे मार्गावरील अस्तित्त्वातील पुलाचे संरचनात्मक लेखापरीक्षण करावे. वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून अवजड वाहनांना मनाई करावी. नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, असेही निर्देश गगराणी यांनी दिले.






