मुंबई : थंडीच्या दिवसात हवामानात झपाट्याने होणाऱ्या बदलांचा अनेकांच्या तब्येतीवर परिणाम होतो. अंगदुखी, ताप यांसारख्या समस्या जाणवतात. अशा वेळी अनेकजण आपल्याजवळ वेदनाशामक औषधांचा साठा ठेवतात, जेणेकरून लागल्यास त्यांचा उपयोग करून लगेच आराम मिळवता येईल. परंतु ही सवय चांगली नाही, कारण किरकोळ वेदनांवरही जर पेन किलर घेत राहिलात, तर भविष्यात याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
आजकालच्या जलद जीवनशैलीत अनेकांना स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्यास वेळ मिळत नाही. दुखू लागल्यावर वेदनाशामक औषधांचा वापर करून दुखणं तात्पुरते थांबवण्याची सवय नेहमीच असते. पण, हे करणं अत्यंत चुकीचं आहे. विशेषतः थंडीच्या दिवसांत डोकेदुखी किंवा अंगदुखी होत असताना लगेच पेन किलर घेणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
वेदनाशामक औषधांचा वापर हानिकारक आहे. जर तुम्ही पेन किलर वारंवार घेत असाल, तर यामुळे अनेक आरोग्यसमस्यांचा सामना करावा लागतो.
अपचन:
तज्ज्ञांच्या मते, पेन किलरचे अति सेवन केल्यास पोटाशी संबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. गॅस, ॲसिडिटी, अल्सर आणि गॅस्ट्रिक रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो.
किडनीच्या समस्या:
पेन किलरचे वारंवार सेवन केल्याने किडनीमध्ये त्याचे बारीक कण जमा होऊ शकतात, ज्यामुळे किडनी स्टोन, किडनी निकामी होणे यांसारखी गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
स्नायू कमकुवत होणे:
सतत पेन किलर घेतल्याने स्नायू कमकुवत होतात आणि हृदयाचे अनियमित ठोके आणि थकवा यासारखी लक्षणे दिसू शकतात, जे थंडीत अधिक तीव्र होऊ शकतात.
म्हणूनच, पेन किलरचे सेवन शक्यतो टाळा आणि आरोग्याच्या गंभीर समस्यांपासून वाचण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषध घेतले पाहिजे.