मुंबई : राज्यभरातील दुकाने २४ तास खुली ठेवण्यास परवानगी असणार आहे. राज्यातील महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्यातील दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापना २४ तास उघडी ठेवता येणार आहेत. मद्यपान गृहे, बार परमिट रूम, हुक्का पार्लर, देशी बार हे २४ तास सुरू राहणार नाहीत. केवळ इतर सर्व आस्थापना ,खाद्यगृहं, आणि दुकाने आता २४ तास सुरू राहतील. हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्व दुकाने, आस्थापना, रेस्तराँ, मॉल आदींना वर्षातील ३६५ दिवस व दिवसातील तीन शिफ्टमध्ये म्हणजेच २४ तास उघडे ठेवता येतील. त्यांना दुकान उघडणे व बंद करण्याच्या वेळाही स्वत:च ठरवता येतील. मद्यविक्री दुकाने, वाइन शॉप, बार, पब, हुक्का पार्लर, ऑर्केस्ट्रा, थिएटर्स यांनाही वर्षातील ३६५ दिवस व्यवसाय चालू ठेवण्याची संमती मिळाली आहे. ३० लाखांपेक्षा जास्त आस्थापनांना याचा फायदा होणार आहे.
१० पेक्षा कमी कामगार असणाऱ्या लघु व मध्यम आस्थापनांना सरकार किंवा मनपाकडे नोंदणीची गरज नाही. आता त्यांना फक्त विहित कागदपत्रांसह व्यवसाय सुरू केल्याची ऑनलाइन सूचना सरकारला द्यावी लागेल. त्याची पोहोच पावतीही ऑनलाइनच मिळेल. दहापेक्षा अधिक कामगार ठेवणाऱ्या स्थापना नोंदणी करण्यासाठी ६० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. नव्या अधिनियमानुसार महिलांना आता पूर्ण वेळ रात्रपाळी म्हणजे रात्री ९.३० ते सकाळी ७ वाजेपर्यंतची ड्युटी करता येईल. मात्र त्यांच्या सुरक्षेची तसेच घरापर्यंत ने-आण करण्याची वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी संबंधित अस्थापनांवर असेल. दुकाने सातही दिवस खुली असणार असली तरी कामगारांना आठवड्याची सुट्टी देण्याचे या कायद्यान्वये बंधनकारक केले आहे. ‘इझ ऑफ डुइंग बिझनेस’ या महत्वाकांक्षी धोरणासाठी हा निर्णय घेतला आहे.