दुबई:आशिया कप २०२५मधील भारत आणि श्रीलंका यांच्यातील रोमहर्षक सामना बरोबरीत सुटला होता. मात्र सुपर ओव्हरमध्ये भारताने बाजी मारली आणि सामना जिंकला. श्रीलंकेने सुपर ओव्हरमध्ये २ विकेट गमावत केवळ दोन धावा केल्या होत्या. अर्शदीपच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेचे फलंदाज काहीच करू शकले नाहीत. त्यानंतर भारताने केवळ एकाच बॉलमध्ये ३ धावा करत सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेवर मात केली आणि सामना जिंकला.
भारताने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक त्यानंतर तिलक शर्माच्या जबरदस्त धावांच्या जोरावर २०२ धावा केल्या होत्या. हे आव्हान सुरूवातीला मोठे वाटत होते. मात्र श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसांका आला आणि त्याने जबरदस्त खेळीला सुरूवात केली.
त्याने या सामन्यात शानदार शतक ठोकत १०७ धावा केल्या. त्याच्या जोरावर श्रीलंकेचे फलंदाज शेवटपर्यंत लढले मात्र काही धावांनी त्यांना हा सामना गमवावा लागला. श्रीलंकेकडून सलामीवीर पथुम निसांकाने जबरदस्त १०७ धावांची खेळी केली. ५८ बॉलमध्ये ७ चौकार आणि ६ षटकांरांच्या जोरावर त्याने ही खेळी साकारली.
अशी होती भारताची खेळी
या सामन्यात पहिल्यांदा धक्का बसला तो शुभमन गिलच्या रूपाने. शुभमन गिल अवघ्या ४ धावा करून बाद झाला. सलामीवीर अभिषेक शर्माचा जबरदस्त फॉर्म या सामन्यातही पाहायला मिळाला. त्याने ३१ बॉलमध्ये ६१ धावांची तुफानी खेळी केली. सूर्याही या सामन्यात चमकदार खेळी करू शकला नाही. त्याच्या बॅटमधून केवळ १२ धावा निघाल्या. संजू सॅमसनने ३९ धावांची खेळी केली. तर हार्दिक पांड्या केवळ २ धावा करू शकला. अक्षर पटेल २१ तर तिलक वर्मा ४९ धावांवर नाबाद राहिले.
भारतीय संघ याआधी आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. तेथे त्यांचा सामना रविवारी पाकिस्तानशी होणार आहे. दुसरीकडे श्रीलंकेच्या संघाचे मात्र फायनल खेळण्याचे स्वप्न भंगले.
भारताचे प्लेईंग ११
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव(कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, अक्षऱ पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह आणि वरूण चक्रवर्ती.
श्रीलंकेचे प्लेईंग ११
पथुम निसंका, कुसल मेंडिस(विकेटकीपर), कुसल परेरा, चरिथ असंलका(कर्णधार), जेनिथ लियानागे, कमिंदू मेंडिस, दासुन शनाका, वनिंदु हसारंगा, दुष्मंथा चमिरा, महीश तीक्ष्णा, नुवान तुषारा.