हवाई दलाला मिळणार ९७ स्वदेशी लढाऊ विमाने; संरक्षण मंत्रालयाने एचएएलशी केला ६२,३७० कोटींचा करार

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात लवकरच ९७ अत्याधुनिक ‘तेजस मार्क-1ए’ लढाऊ विमाने दाखल होणार आहेत. केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) सोबत ६२,३७० कोटी रुपयांचा एक मोठा करार केला आहे, ज्यामुळे देशाच्या संरक्षण क्षेत्राला मोठा बूस्ट मिळेल. हा करार 'आत्मनिर्भर भारत' अभियानांतर्गत देशातील सर्वात मोठ्या स्वदेशी लष्करी खरेदीपैकी एक आहे.



स्वदेशी संरक्षणासाठी ऐतिहासिक पाऊल


या महत्त्वाकांक्षी करारानुसार, एचएएल भारतीय हवाई दलासाठी ६८ लढाऊ विमाने आणि २९ दोन-सीटर विमानांची निर्मिती करणार आहे. ही विमाने सध्याच्या मिग-२१ विमानांची जागा घेणार आहेत. यापूर्वी ८३ तेजस विमानांसाठी ४८,००० कोटींचा करार झाला होता, त्यामुळे हा नवीन करार आतापर्यंतचा सर्वात मोठा मानला जात आहे.


'तेजस मार्क-1ए' हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहे. यात प्रगत एईएसए (Active Electronically Scanned Array) रडार, स्व-संरक्षण यंत्रणा आणि ६४% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीचा वापर केला जाणार आहे. एकूण ६७ नवीन स्वदेशी उपकरणांचा समावेश यामुळे 'तेजस' अधिक शक्तिशाली बनेल. या प्रकल्पाच्या माध्यमातून आगामी सहा वर्षांत दरवर्षी सुमारे ११,७५० नवीन रोजगार निर्माण होणार आहेत. विमानांची डिलिव्हरी २०२७-२८ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हवाई दलाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.


हा करार अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा भारतीय हवाई दलातून ६२ वर्षे जुन्या आणि विश्वासार्ह मिग-२१ विमानांना निवृत्त केले जात आहे. मिग-२१ च्या निवृत्तीमुळे हवाई दलाची स्क्वॉड्रन संख्या ४२ वरून २९ वर आली आहे, परंतु तेजस मार्क-१ आणि मार्क-२ विमानांच्या समावेशामुळे ही कमतरता भरून निघेल. मिग-२१ ने भारताच्या हवाई ताफ्यात एक युग निर्माण केले होते, आता तेजस हे नवीन युग सुरू करणार आहे.


एचएएलने सुरुवातीला दरवर्षी १६ विमाने बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतु आता ९७ विमानांची अतिरिक्त ऑर्डर मिळाल्याने त्यांनी प्रतिवर्षी ३२ विमाने तयार करण्याची तयारी केली आहे. यामुळे देशाची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.



अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्ये


नवीन तेजस मार्क-1ए मध्ये ४३ तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत, ज्यात शस्त्रे आणि देखभालीची प्रणाली अधिक प्रगत झाली आहे. यात इस्रायली ईएल/एम-२०५२ रडारचा वापर केला जाणार आहे, जे जुन्या रडारपेक्षा अधिक प्रभावी आहे. तसेच, इस्रायली ईएल/एम-८२२२ जॅमर पॉडमुळे ते शत्रूंच्या रडार सिग्नलमध्ये व्यत्यय आणू शकेल, जे आधुनिक हवाई युद्धासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.


या विमानांमध्ये प्रगत क्लोज-रेंज, बीव्हीआर आणि लांब पल्ल्याची बीव्हीआर क्षेपणास्त्रे बसवली जातील. याशिवाय, ते ५०० किलो वजनाचे बॉम्ब आणि इतर शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असेल. एकूणच, हा करार केवळ हवाई दलाची ताकद वाढवणार नाही, तर भारताला संरक्षण उत्पादन क्षेत्रात एक मजबूत जागतिक खेळाडू म्हणून उभे करण्यासही मदत करेल.

Comments
Add Comment

Vande Mataram : वंदे मातरमच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून राष्ट्रगीत गायले जाणार

जेन-झींचं प्रतिनिधीत्व अधिक पाहायला मिळणार नवी दिल्ली : सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण मानला जाणाऱ्या

Agni-5 Mk2 : अग्नी-5 Mk2 मध्ये मोठे अपग्रेड; वजन 20 टक्क्यांनी घटल्याचा दावा, वाढणार मारक क्षमता

नवी दिल्ली : भारत आपल्या संरक्षण क्षमतेत सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करत आहे. ब्रह्मोस आणि अग्नी

Justice Yashwant Varma : न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध; संसदेत चौकशी समितीचा अहवाल सादर

नवी दिल्ली: न्यायाधीशांच्या अधिकृत निवासस्थानी जळित नोटांची बंडले सापडल्याप्रकरणी वादात सापडलेले माजी

Karnataka Bandh : कावेरी पाणीवाटपाच्या विरोधात कर्नाटक बंद; जाणून घ्या काय सुरू, काय राहणार बंद?

बंगळुरू : कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने (CWMA) १२ ऑगस्टपासून पुढील १५ दिवस तमिळनाडूला दररोज १२ हजार क्युसेक

Ladakh Earthquake : लडाखमध्ये पहाटेच भूकंपाचा जोरदार धक्का! लेहमध्ये ५.५ रिश्टर स्केलचे हादरे, नागरिकांमध्ये घबराट

लेह : लडाखमधील लेह शहराला गुरुवारी पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला. सकाळी सुमारे ६ वाजून ५ मिनिटांनी भूकंपाचे

'ATAGS' artillery gun is ready : १५ सेकंदात ३ हल्ले आणि ४८ किमीचा अचूक पल्ला; चीन-अमेरिकाही चकित

नवी दिल्ली: रणांगणावर भारताच्या सं