दुबई: आशिया कप २०२५च्या सुपर ४मध्ये भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी १७२ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान ६ विकेट राखत पूर्ण केले आणि आशिया कपमध्ये दुसऱ्यांदा पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानने भारताविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत १७१ धावा केल्या होत्या.
पाकिस्तानने दिलेले १७२ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात जबरदस्त झाली होती. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला स्फोटक सुरूवात करून दिली होती. एकही गडी न गमावता भारताने १००च्या वर धावसंख्या नेली होती. मात्र १०५ धावसंख्येवर असताना शुभमन गिल बाद झाला. त्याने ४७ धावा केल्या. त्यानंतर पुढच्याच क्षणी सूर्यकुमार यादव बाद झाला. कर्णधाराला भोपळाही फोडता आला नाही. काही वेळाने अभिषेक शर्माही ७४ धावा करून बाद झाला. अखेरीस तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांनी सावध खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पाकिस्तानने भारताच्या खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा घेत २० षटकांत पाच गडी बाद करत १७१ धावा केल्या. पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज साहिबजादा फरहानने ५८ धावा केल्या. भारताकडून शिवम दुबेने दोन विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादवला एकेक विकेट घेण्यात यश आलं.
भारतीय संघाने या सामन्यात अतिशय खराब क्षेत्ररक्षण केले. अभिषेक शर्माने साहिबजादा फरहानचा झेल सोडला आणि त्याला जीवनदान मिळाले. भारताला पहिल्याच षटकात यश मिळू शकले असते. पण अभिषेक झेल घेऊ शकला नाही. फरहानला त्याचे खातेही उघडता आले नसते. पण त्याला पहिल्याच षटकात जीवदान मिळाले. हार्दिक पांड्याने तिसऱ्या षटकात भारतासाठी पहिली विकेट घेतली. पाकिस्तानचा सलामीवीर फखर झमान संजू सॅमसनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. फखर आणि साहिबजादा फरहानने पाकिस्तानला वेगवान सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. पण हार्दिकने फखरला बाद केले. त्याने ९ चेंडूत तीन चौकारांसह १५ धावा केल्या. भारताला पॉवरप्लेमध्ये केवळ एक विकेट मिळाली. तर पाकिस्तानची सुरुवात मागील सामन्यापेक्षा चांगली होती. पहिल्या ६ षटकांमध्ये भारताचे क्षेत्ररक्षण खराब होते आणि त्यांनी दोन झेल सोडले. ६ षटकांच्या शेवटी पाकिस्तानने एक बाद ५५ धावा केल्या.
सॅम अयुबच्या रूपात भारताला दुसरी विकेट मिळाली. शिवम दुबेने अयुबला २१ धावांवर बाद केले. त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला. यामुळे अयुब आणि फरहान यांच्यातील दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी संपुष्टात आली. यानंतर लगेचच कुलदीप यादवने हुसेन तलतला बाद करून पाकिस्तानला तिसरा धक्का दिला. तलत ११ चेंडूत १० धावा काढून बाद झाला.
शिवम दुबेने साहिबजादा फरहानला बाद करून भारताला चौथी विकेट मिळवून दिली. सामन्यात फरहानला तीन जीवदान मिळाले होते. यावेळी सूर्यकुमार यादवने कॅच घेण्यात कोणतीही चूक केली नाही. फरहान ४५ चेंडूत ५८ धावा काढून बाद झाला त्याने पाच चौकार आणि तीन षटकार मारले. यानंतर
मोहम्मद नवाज धावबाद झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. सलमान आघा बुमराहच्या चेंडूवर एक धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. पण नवाज क्रीजपर्यंत पोहोचू शकला नाही. सूर्यकुमारने चेंडू पाहिला आणि तो फेकला. नवाज १९ चेंडूत एक चौकार आणि एक षटकार मारत २१ धावा काढून बाद झाला.
शेवटच्या षटकांमध्ये पाकिस्तानच्या फंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. आणि २० षटकांमध्ये १७१ धावांपर्यंत मजल मारली. जसप्रीत बुमराहला या सामन्यात एकही विकेट घेतला आली नाही. त्याने ४ षटकांत तब्बल ४५ धावा दिल्या.