सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वनतारा प्रशासनाकडून अहवाल मिळेपर्यंत कोणताही निर्णय घेता येणार नाही, असे उच्चस्तरीय समितीने म्हटले आहे. सध्या तो अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याने आणि त्याच्या प्रक्रियेस विलंब होत असल्याने, सोमवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवात महादेवी हत्तीण पुन्हा मठात आणली जाणार नाही, असे संकेत मिळत आहेत.
कोल्हापूरच्या नांदणी येथील जैन मठात ३३ वर्षांपासून असलेली माधुरी उर्फ महादेवी हत्तीण याबाबतचा वाद “महादेवी हत्ती प्रकरण” म्हणून ओळखला जातो. नांदणी मठासह नागरिकांची तिला वनतारामधून कोल्हापूरला परत आणण्याचा आग्रह आहे. तर न्यायालय व प्राणीसंवर्धन संस्था हिच्या आरोग्य व कल्याणाला प्राधान्य देत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तिला जामनगरच्या “वनतारा” पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आले असून, या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यामुळे धार्मिक भावना, जनआंदोलन आणि प्राणीसंवर्धन कायदे अशा तिघांच्या कचाट्यात हे प्रकरण अडकल्याने राज्यभर चर्चेत आहे.