१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन त्यांना शासन आर्थिक पाठबळ देईल. त्यातून उद्योग व्यवसाय करुन त्या स्वावलंबी होतील. राज्यातील एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी करण्याचा संकल्प असल्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’ चा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किनगाव (ता. फुलंब्री) येथे झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये दि.१७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' राबविले जाणार आहे.


किनगाव येथील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या आवारात आयोजित या सोहळ्यास सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार डॉ. कल्याण काळे आणि संदीपान भुमरे, आमदार सर्वश्री संजय केणेकर, प्रशांत बंब, रमेश बोरनारे, आमदार श्रीमती अनुराधा चव्हाण, आमदार श्रीमती संजना जाधव तसेच ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, तसेच आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे, पाणी फाऊंडेशनचे अविनाश पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.



लोकसहभाग अभियानाचा गाभा


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला उपस्थितांना मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मराठवाड्याची दुष्काळापासूनही मुक्ती करु असा निर्धार व्यक्त करुन श्री. फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे योजनांची अंमलबजावणी करुन लाभ देण्याचे अभियान तर आहेच, मात्र हे प्रत्येक ग्रामस्थाला स्वाभिमानाने जगायला शिकवणारे अभियान आहे. लोकसहभाग या अभियानाचा मूळ गाभा आहे.



लाडक्या बहिणींना उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य


श्री. फडणवीस म्हणाले की, लाडक्या बहिणी यांना केवळ १५०० रुपयांवर अवलंबून रहावे लागू नये, त्यांना महिला बचत गटांच्या माध्यमातून उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य देऊन सक्षम करण्यात येईल. प्रत्येक गावात लाडक्या बहिणींची एक पतसंस्था सुरु करुन जिल्हा बॅंकेमार्फत त्यांना १ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन त्यांच्या पाठीशी शासन उभे राहील. अशाप्रकारे राज्यातील एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवणार,असा संकल्प मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.



पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात लोकांच्या जीवनात परिवर्तन


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 'सेवा पंधरवडा' राबविण्यात येत आहे, त्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरु करण्यात आले आहे. पंतप्रधानाच्या नेतृत्वात देशाने प्रगती केली असून २५ कोटी लोक गरिबी रेषेखालून वर आले आहेत. आज १५ कोटी लोकांना स्वतःचे घर उपलब्ध होऊ शकले. लोकांच्या जीवनात परिवर्तन आले, हे सगळे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात घडलं, असे मुख्यमंत्री म्हणाले.



२८ हजार ग्रामपंचायती विकासाचे मॉडेल बनविणार


ग्रामविकासाच्या अनेक योजना, अभियाने आली पण त्यात ठरविक गावेच पुढे गेली. आता या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून प्रत्येक गावांगावांतून समृद्ध महाराष्ट्र घडेल. अशा स्पर्धांमध्ये कोणतेही गाव मागे राहू नये यासाठी हे अभियान सुरु केले आहे. या अभियानात केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजना गावात राबविण्यात येतील. त्या माध्यमातून राज्यातील २८ हजार ग्रामपंचायती आणि ४० हजार गावे मॉडेल म्हणून विकसित करू, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.



सहकारालाही बळकटी


या योजनेचे प्रमुख सात स्तंभ आहेत.त्याद्वारे सुशासनयुक्त पंचायत, प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविणे, जल समृद्ध गावे करणे, प्रत्येक गाव स्वच्छ आणि जलसमृद्ध करणे, वृक्षारोपण, गावाच्या विकासासाठी मनरेगा आणि अन्य योजनांचे अभिसरण करण्यात येईल. गावातील अर्थकारणाला बळकटी देण्यासाठी संस्थांचे बळकटीकरण करतानाच गावातील सेवा संस्थांना १७ उद्योग, व्यवसाय देऊन त्याद्वारे सहकारालाही बळकटी देऊ, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.



२५० कोटींची पारितोषिके देणारी पहिलीच योजना


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या ग्रामपंचायतींना तब्बल २५० कोटी रुपयांचे पारितोषिके दिली जाणार आहेत. इतकी पारितोषिके देणारी ही देशातील पहिलीच योजना आहे.



सुप्त शक्तीची आठवण करुन देण्यासाठी अभियान


या अभियानामुळे वंचित घटकांच्या जीवनात बदल घडवू. त्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. गावात एकजूटीने राहून आपण समृद्धी आणू. राज्यातील अनेक गावांत लोक वेगवेगळे प्रयत्न करुन परिवर्तन घडवित आहेत. एआयचा कृषीत वापर केला जात आहे. आपल्या प्रत्येकामध्ये हे परिवर्तन घडविण्याची सुप्त शक्ती आहे. त्या सुप्त शक्तीची आठवण करुन देण्यासाठीच हे अभियान आहे. प्रत्येक ग्रामस्थाने हे अभियान आपले आहे असे समजून सहभाग द्यावा आणि सक्षम महाराष्ट्र घडवावा, आजपासून ही स्पर्धा सुरु झाली अशा शब्दात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थितांना आवाहन केले.

Comments
Add Comment

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी खळबळ! प्रा. मोटेगावकर पुन्हा सीबीआयच्या रडारवर?

देशभरात गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाने (NEET Paper Leak Case) आता आणखी गंभीर वळण घेतल्याची चर्चा रंगू लागली आहे. लातूरमधील

Vidhanparishad Elections : विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी १८ जूनला मतदान

२२ जूनला मतमोजणी; स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकार मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर मुंबई : गेल्या अनेक

NEET Paper Leak Case : NEET निकालात ‘१८० पैकी १८०’चा दावा; नांदेडच्या क्लासवर CBIचा छापा

नांदेड : NEET परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाने देशभरात खळबळ उडालेली असतानाच आता महाराष्ट्रातील नांदेड शहर पुन्हा

Pune Nasrapur Girl Murder Case : नसरापूर प्रकरणातील मोठी अपडेट! १५ दिवसांत ११०० पानांचं आरोपपत्र, नराधमाला फाशीची शक्यता वाढली

पुणे : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुरडी अत्याचार आणि हत्या प्रकरणात आता

Blinkit News : ऑनलाईन फूड डिलिव्हरीचा धक्कादायक प्रकार; एक्स्पायर मटकी पोहोचल्याने संताप

अकोला : ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या वाढत्या वापरामुळे ग्राहकांना घरबसल्या सुविधा मिळत असल्या, तरी याच सेवांच्या

Operation Antim Prahaar अंतर्गत ८ नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली जिल्हा अखेर नक्षलमुक्त

गडचिरोली : नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' या