मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं नाव अग्रेसर ठरतं. २००८ साली निर्माता असित मोदी यांनी सुरू केलेली ही मालिका तब्बल १७ वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता या मालिकेने इतिहास रचत ४५०० भाग पूर्ण केले असून, भारतातील सर्वाधिक काळ चालणारी सिटकॉम मालिका बनली आहे.
‘तारक मेहता’ परिवारात जल्लोष
४५०० भाग पूर्ण केल्यानंतर या विशेष टप्प्याचा आनंद साजरा करण्यासाठी ‘तारक मेहता’ परिवार एकत्र आला. या सोहळ्यात लेखन, तांत्रिक विभाग, सेट डिझायनिंग आणि प्रोडक्शन स्टाफ अशा सर्व पाठीमागे काम करणाऱ्या सदस्यांचा गौरव करण्यात आला. जवळपास दोन दशकं या मालिकेची लोकप्रियता टिकवून ठेवणाऱ्या प्रत्येक हातामागे असलेलं श्रम आणि समर्पण याचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी निर्माता असित मोदी यांनी संपूर्ण टीमसोबत केक कापून आनंद व्यक्त केला.
असित मोदी म्हणाले, “ही यशोगाथा केवळ आमच्या टीमची नाही, तर सुरुवातीपासून आमच्यासोबत असलेल्या प्रत्येकाची आहे. खरी ताकद म्हणजे ते सर्व लोक, ज्यांच्या मेहनतीमुळेच हा शो इतका पुढे पोहोचला आहे. मी कलाकार, टीम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांचे आभार मानतो. त्यांच्या प्रेमामुळेच आम्ही इथवर आलो आहोत.”
गिनीज बुकमध्ये दोनदा नोंद
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ने केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत, तर विक्रमांच्या पुस्तकातही आपली छाप सोडली आहे. या मालिकेचं नाव दोन वेळा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलं आहे. २०२१ साली भारतातील सर्वाधिक काळ चालणा-या सिटकॉम मालिकेचा मान मिळाला, तर २ जुलै २०२२ रोजी मालिकेने ३५०० भाग पूर्ण करत आणखी एकदा गिनीज बुकमध्ये स्थान मिळवलं. यापूर्वी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही या मालिकेने आपली नोंद केली होती.