कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये; मंत्री छगन भुजबळ यांचे ओबीसी बांधवांना आवाहन

ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या कुटुंबियांचे भुजबळांनी केले सांत्वन, म्हणाले...


लातूर: मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या यशस्वी आंदोलनामुळे, ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या नैराश्यातून लातूरच्या भरत महादेव कराड या तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना काल घडली.  त्यामुळे आज, ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मृत तरुणाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यादरम्यान त्यांनी, "ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आपण लढत आहोत. आपल्या देशात लोकशाही व्यवस्था असून न्यायव्यवस्थेवर आपला पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आपण न्यायालयीन आणि प्रसंगी रस्त्यावरील दोन्ही लढाया देखील लढू. त्यामुळे कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये." असे आवाहन ओबीसी समाजाला केले आहे.


आत्महत्या केलेला तरुण भरत महादेव कराड हा लातूर जिल्ह्यातील वांगदरी (ता. रेणापूर) येथील स्थानिक होता. ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या नैराश्यातून त्याने आपले जीवन संपवलं. ज्यामुळे कराड कुटुंबियांवर दुःखाचा गोंधळ कोसळला. त्यामुळे त्यांचे सांत्वन करण्यासाठी मंत्री भुजबळ यांनी कराड कुटुंबीयांची त्यांच्या घरी  जाऊन भेट घेतली. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंढे, आमदार रमेश कराड, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे, ॲड.सुभाष राऊत, सरपंच विजय गंभिरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


मंत्री छगन भुजबळ यांनी स्वर्गीय भरत कराड यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी भरतच्या लहानग्या मुलाला पाहून मंत्री छगन भुजबळ यांना गहिवरून आले. त्यांनी या लहानग्या मुलाचे अश्रू पुसत कुटुंबियांना धीर दिला आणि आर्थिक मदत सुपूर्द केली.


यावेळी उपस्थित जनसमुदायासमोर मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, "स्व.भरत कराड यांनी ओबीसींचा ध्यास घेतलेला होता. जिथे जिथे ओबीसीच्या सभा व मेळावे असायच्या तिथ तिथं ते जात होते. ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होता कामे नये ही त्यांची भावना होती. ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. गरीब ओबीसींच्या ताटात वाटेकरी नको असे त्यांना वाटायचे" असे ते म्हणाले.



कुणीही असे टोकाचं पाऊल उचलू नका


ते पुढे असे देखील म्हणाले की, भरत कराडची आत्महत्या ही अतिशय दुर्दैवी घटना असून या घटनेने मन सुन्न झाले आहे. त्यामुळे कुणीही असे टोकाचं पाऊल उचलू नका,
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांप्रमाणे लढा द्या. या देशात आणि राज्यात लोकशाही आहे. इथे कोणाचीही दादागिरी चालणार नाही. सर्व अठरा पगड जातींनी एकत्र रहा, एकजूट ठेवा. ओबीसींचे आरक्षण टिकवण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहोत. त्यामुळे कुठल्याही ओबीसी बांधवाने आत्महत्या करू नये. आपल्या लेकरा बाळांचा विचार करून कोणीही असे टोकाचे पाऊल उचलू नये. आम्ही आमची जबाबदारी निश्चितपणे पार पाड. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लाऊ देणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.


ते म्हणाले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी घटकाला आरक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे संविधानात म्हटले. त्यानंतर मंडल आयोगाने अभ्यास करून २७ टक्के आरक्षण दिले. मराठा समाज्याला ओबीसी मध्ये आरक्षण देता येणार नाही असे अनेक आयोगांनी सांगितले. केंद्र सरकारने मराठा समाजाला १० टक्के EWS आरक्षण दिले. राज्य सरकाने १०टक्के स्वतंत्र SEBC आरक्षण दिले. शिक्षण आणि नोकऱ्यांसाठी शासनाने मराठा समाजाला ओबीसींना पेक्षा जास्त योजना लागू केल्या आहे. मात्र यांना ओबीसी मध्येच यायचे आहे, असा काहींचा हट्ट आहे. त्यामुळे प्रेशर खाली हा जीआर निघाला. हा जीआर ओबीसींच्या मुळावर घाव आहे. लोक म्हणता आता संपलं आपलं आरक्षण त्यामुळे लोक आत्महत्या करुन बलिदान देता आहे. आम्ही कोर्टासह रस्त्यावरची सुद्धा लढाई लढू. छत्रपती शिवजी महाराजांच्या मावळ्यांच्या प्रमाणे धैर्याने, संयमाने आणि एकजुटीने हा लढा देऊ.” आणि ओबीसींच्या मागे खंबीर उभे राहू, त्यामुळे कोणीही असे आत्महत्या सारखे पाऊल उचलू नये असे आवाहन त्यांनी केले.


ते म्हणाले की, राज्यात ओबीसींच्या लेकरा बाळांना शिक्षण नोकऱ्या नको आहे का ? अनुदान देताना आणि योजना राबविताना ओबीसींवर घोर अन्याय होत आहे. जी मागणी संविधान विरोधी आणि न्यायालयाच्या विरोधात आहे त्यासाठी अख्खा महाराष्ट्र वेठीस धरला जात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

Comments
Add Comment

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि

Amravati : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूची NHRCकडून स्वतःहून दखल; महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस

अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा