मुंबई: आजपासून दहा दिवस राज्यभरात गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2025) धामधूम पाहायला मिळणार आहे, घराघरात आणि विविध सार्वजनिक मंडळामध्ये बाप्पांचे आगमन झाले आहे. अनेक सिनेतारकांच्या घरात देखील हे बाप्पा विराजमान होतात. अभिनेता स्वप्नील जोशीच्या (Actor Swwapnil Joshi) घरी सुद्धा सालाबादप्रमाणे दीड दिवसाच्या गणरायाचे आगमन झाले आहे. ज्याच्या दर्शनासाठी स्वप्नील जोशीच्या घरी या दिवसांत असंख्य पाहुणे ये जा करत असतात. सामान्यतः कुणाच्या घरी गणपतीच्या दर्शनाला जाताना मिठाई घेऊन जाण्याची पद्धत आहे. पण स्वप्नील जोशीच्या घरी एक वेगळीच पद्धत अवलंबली जाते. किंबहुना घरी दर्शनासाठी येणाऱ्यांना तो तसा अग्रहच करतो. जोशी कुटुंबाच्या घरच्या गणेश आमंत्रण पत्रिकेत "मिठाईऐवजी अर्धा किलो तांदूळ आणा" असा उल्लेख असतो, यामागे एक खास कारण आहे.
दरवर्षी विविध गरजेच्या वस्तू प्रसाद म्हणून स्वप्नीलच्या घरी स्वीकारल्या जातात. त्यानुसार यंदा मिठाईऐवजी अर्धा किलो तांदूळ स्वीकारले जातील, असं स्वप्नीलनं सांगितलं आहे. याबद्दल स्वप्नीलने एका मुलाखतीत सांगितले की, "दरवर्षी माझ्या घरच्या गणपतीच्या दर्शनावेळी अनेकलोकंजण मिठाई आणायचे. ही मिठाई सर्वांना वाटूनही उरायची. मग उरलेल्या मिठाईचं करायचं काय? हा प्रश्न आम्हाला पडायचा. सात वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी मिठाईऐवजी गृहोपयोगी वस्तू प्रसाद म्हणून स्वीकारण्याची कल्पना मांडली. गणेशोत्सवानंतर मिळालेल्या वस्तू एखाद्या गरजू संस्थेला दान करू असं ठरवलं. तेव्हापासून दरवर्षी अशा गरजेच्या वस्तू आम्ही प्रसाद म्हणून स्वीकारतो.'
याच उपक्रमाअंतर्गत पेन्सिल बॉक्स, दोनशे पानी वही, डाळ, साखर अशा गृहोपयोगी वस्तू एकेका वर्षी मागवल्या होत्या. या सर्व वस्तू मग कधी शाळा, कधी अनाथाश्रम, कधी एखाद्या समाजसेवी संस्थेला तो दान करतो. मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार स्वप्नील जोशीच्या या स्तुत्य उपक्रमाला दरवर्षी त्याचे मित्र मंडळी तसेच चाहते भरभरून प्रतिसाद देतात.