Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार, किन्नौर ढगफुटीने उध्वस्त; घरं-गाड्या पुरात गेल्या वाहून

किन्नौर : हिमाचल प्रदेशात निसर्गाने पुन्हा एकदा आपला प्रकोप दाखवला आहे. किन्नौर जिल्ह्यातील ऋषी डोंगरी खोऱ्यात झालेल्या ढगफुटीमुळे होजिस लुंगपा नाल्याला अचानक पूर आला. या पुरामुळे सतलज नदीच्या दुसऱ्या बाजूस चार जण अडकून पडले, तर एक व्यक्ती जखमी झाली. पुराचा जोर इतका प्रचंड होता की सीपीडब्ल्यूडीचा संपूर्ण कॅम्प वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच, ट्रिपिक्स ब्रिगेडची बचाव पथके तात्काळ घटनास्थळी रवाना झाली. रात्रीच्या अंधारात, पाण्याच्या प्रचंड प्रवाहाशी झुंज देत आणि कठीण डोंगरी मार्ग पार करत त्यांनी अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. लोकांना रात्रभर सुरक्षित ठेवण्यासाठी पथकाने विशेष हाय अल्टिट्यूड ड्रोन (LDHA) चा वापर करून अन्न, पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवल्या. दरम्यान, जखमी व्यक्तीला सुरक्षितपणे बाहेर काढून रेकाँग पेओ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या बचाव मोहिमेत दाखवलेली तत्परता आणि धैर्य, नैसर्गिक संकटांमध्ये मानवी जीव वाचवण्यासाठी किती महत्त्वाची असते, याचे उत्तम उदाहरण ठरली.



प्रशासन सतर्क


हिमाचल प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून निसर्गाचा कहर सुरू असून प्रशासन सतत सतर्क मोडवर आहे. किन्नौरमधील ढगफुटी आणि अचानक आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिमला, लाहौल आणि स्पिती या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. अनेक पूल प्रचंड पाण्याच्या लाटांमध्ये वाहून गेले आहेत, तर तब्बल ३०० हून अधिक रस्ते सध्या वाहतुकीसाठी बंद आहेत. गणवी खोऱ्यात काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे एक पोलीस चौकी पूर्णपणे वाहून गेली, तर शिमला जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे अनेक व्यापाऱ्यांचे दुकानं व मालमत्ता पाण्याखाली गेली आहे. सुदैवाने, आतापर्यंत या घटनांमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. तरीही, हवामान विभागाने आणखी पावसाचा इशारा दिल्याने प्रशासन आणि स्थानिक बचाव पथके कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहिली आहेत.




 

हिमाचलमध्ये पावसाचा कहर; ३२५ रस्ते ठप्प


हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे आणि ढगफुटीच्या घटनांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लाहौल आणि स्पिती जिल्ह्यातील मायाड खोऱ्यातील करपट भागात झालेल्या ढगफुटीनंतर चांगुट आणि उडगोस नाल्यांना अचानक पूर आला. या भीषण पाणलोटामुळे दोन पूल वाहून गेले, तर परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. पूर आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून अनेक एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. प्रशासन बचाव आणि मदत कार्यात पूर्ण क्षमतेने गुंतले आहे. राज्यभरातील या आपत्तीमुळे वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. दोन राष्ट्रीय महामार्गांसह तब्बल ३२५ रस्ते बंद करण्यात आले आहेत. राज्य आपत्कालीन ऑपरेशन सेंटरच्या (SEOC) आकडेवारीनुसार, यापैकी सर्वाधिक १७९ रस्ते मंडी जिल्ह्यात तर ७१ रस्ते शेजारच्या कुल्लू जिल्ह्यात बंद आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



ऑरेंज-यलो अलर्ट; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन


हवामान विभागाने हिमाचल प्रदेशातील काही भागांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. गुरुवारी, राज्यातील कांगडा, मंडी, शिमला आणि सिरमौर या चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सोलन, उना, कुल्लू आणि चंबा या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत नद्या-नाल्यांच्या काठावर जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अत्यंत गरजेअभावी घराबाहेर पडू नये, असा सल्लाही अधिकाऱ्यांनी दिला आहे. हवामानातील या प्रतिकूल परिस्थितीमुळे पूर, भूस्खलन आणि रस्ते बंद होण्याच्या घटना घडू शकतात, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला