मुंबई : महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता व नाविन्यता धोरणा २०२५ धोरणामध्ये ‘मुख्यमंत्री उद्योजकता व नाविन्यता महाफंड’ योजना राबविण्यात येणार आहे. विविध तंत्रशिक्षण प्राप्त ३० लाख युवक-युवतींची शासनाकडे नोंद आहे. या सर्वांना ईमेल करून त्यांची एआयव्दारे परीक्षा घेण्यात येईल. यामध्ये पाच लाख युवक-युवतींना विविध परीक्षांती निवडण्यात येईल. यातून पुन्हा चाळणी करून १ लाख उमेदवारांची निवड मूल्यांकन चाचण्या, स्पर्धा व हॅकाथॉनच्या माध्यमातून केली जाईल.
अंतिम टप्प्यात २५,००० निवडक उमेदवारांना त्यानंतर तांत्रिक सहाय्य, आर्थिक मदत आणि प्रशिक्षण देऊन यशस्वी उद्योजक, स्टार्टअप्स तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. आयटीआयमध्ये तांत्रिक शिक्षणासोबत इतर अनुषंगिक व्यक्तीमत्व विकासाचे २० अभ्यासक्रम १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
मंत्री लोढा म्हणाले की, “महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण २०२५” ला मान्यता देण्यात आली असून या धोरणाची अधिकृत अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राबविले जाणार आहे. या धोरणात पुढील पाच वर्षांसाठी १.२५ लाख उद्योजक घडवणे व ५०,००० स्टार्टअपना मान्यता हे धोरणाचे उद्दिष्ट आहे.
या धोरणात निवडलेल्या उमेदवारांना वित्तीय संस्थांच्या भागीदारीतून कर्ज सहाय्य दिले जाईल. ५ वर्षांच्या कालावधीसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी उभारला जाईल. यामधील सर्व योजना महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी सहाय्याने राबवण्यात येतील, जी राज्यातील नाविन्यता व उद्योजकता क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून काम करेल.
ते म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त मुंबईत 'ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभचे' आयोजन करण्यात आले आहे. येत्या दि. १३ ते २२ ऑगस्ट दरम्यान कुर्ला येथे जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानात, मुंबईकरांना पारंपरिक खेळांचा थरार पाहायला मिळणार आहे. या क्रीडा महाकुंभच्या माध्यमातून लेझीम, फुगडी आणि लगोरी, विटी दांडूसह शिवकालीन पारंपरिक खेळांना पूनर्वैभव मिळवून देणार आहे. कुर्ला येथे जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानात होणाऱ्या या क्रीडा महाकुंभात जनतेनेही सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले.