दि बी. ई. एस. टी. वर्कर्स युनियनच्या वतीने, १ ऑगस्ट २०२२ नंतर बेस्ट उपक्रमातून सेवानिवृत्त झालेल्या ४,५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी व इतर थकित देणी तातडीने देण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात आला. युनियन तर्फे सरचिटणीस शशांक राव यांनी कामगारांचे निवेदन माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांना दिले. मंत्री शेलार यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी संपर्क साधला. युनियनच्या शिष्टमंडळाबरोबर या विषयावर चर्चा करण्यास सांगितले. तसेच शेलार यांनी कामगारांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचे आश्वासनही दिले.