गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय असले पाहिजे. जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासन सातत्याने कार्यरत असून या क्षेत्रातील नवोपक्रमांना संशोधनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात आहे. प्रत्येक भारतीयाला गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पोहचविणे हेच देशसेवेचे महत्त्वपूर्ण अंग असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अधोरेखित केले.


लोक भवन येथील दरबार सभागृहात पी. डी हिंदुजा रुग्णालयाच्या 'जीवन वाचवणे आणि निरोगी भारत निर्माण करणे' या देशव्यापी मोहिमेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मोहिमेचे उद्घाटन राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले.


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, देशात औषधनिर्मिती आणि आरोग्य सुविधांच्या क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. सर्व देशवासी निरोगी राहावेत, यासाठी आयुष्यमान भारत अंतर्गत एक लाखांहून अधिक आरोग्य मंदिर कार्यरत आहेत. तसेच मिशन इंद्रधनुष्य सारख्या उपक्रमांद्वारे लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली आहे. देशात 12 कोटींहून अधिक कुटुंबांना आयुष्यमान भारत कार्ड वितरित करण्यात आले असून यामुळे लाखो नागरिकांना उपचारांचा आधार मिळाला आहे.


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही तातडीच्या वैद्यकीय सेवांना प्राधान्य देत रुग्णवाहिका सेवा व ट्रॉमा केअर सेंटरच्या सुविधा वाढविण्यावर भर दिला आहे. यासोबतच जनसामान्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे अत्यावश्यक आहे. योग्य वेळी उपचारांची माहिती व सुविधा उपलब्ध झाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात,असेही त्यांनी नमूद केले. देशात अनेक महत्त्वपूर्ण औषधांचे उत्पादन होत असले तरी काही वैद्यकीय उपकरणे व औषधे आयात करावी लागतात. ती देशातच तयार व्हावीत यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही राष्ट्रपती मुर्मू यांनी केले.


कोविडनंतरच्या काळात मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. एकाकीपणा, उदासीनता यांसारख्या समस्यांमुळे वैयक्तिक, कौटुंबिक व व्यावसायिक आयुष्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे मानसिक आरोग्य सेवाही तितक्याच सक्षमपणे उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा राष्ट्रपती मुर्मू यांनी यावेळी व्यक्त केली.


वैद्यकीय शिक्षणासाठी पदव्युत्तर पदवीच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक राज्यांमध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान रुग्णालये सुरू करण्यात आली असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. हिंदुजा हॉस्पिटल समूह यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या “जीव वाचविणे, निरोगी भारत निर्माण करणे” (Saving Lives, Building a Healthier Bharat Mission) या अभियानाचे त्यांनी कौतुक केले. वर्षभर चालणाऱ्या या उपक्रमांतर्गत दुर्गम व ग्रामीण भागात रुग्णसेवा पुरविण्यात येणार असून तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून जीव वाचविण्याचे पुण्यकर्म या अभियानाच्या माध्यमातून होत असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी काढले.


नैसर्गिक जीवनपद्धतीचा अवलंब केल्यास वैद्यकीय क्षेत्रावरील ताण कमी – राज्यपाल आचार्य देवव्रत


नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचे धोरण सरकारने स्वीकारले असून, नैसर्गिक जीवनपद्धतीचा अवलंब केल्यास वैद्यकीय क्षेत्रावरील ताण कमी होऊ शकतो. मानव, निसर्ग आणि धरती वाचवण्यासाठी आजारांचे वाढते प्रमाण रोखण्याच्या दृष्टीने वैद्यकीय तज्ञांनी कार्य करण्याची गरज असल्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सांगितले.


कोविड-१९ काळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने लसीचा शोध लावून ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ या तत्वानुसार जगातील अनेक देशांना लस उपलब्ध करून दिली. गरीब व वंचित घटकांसाठी कार्य करणे हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा पैलू असून, त्याच भावनेतून आरोग्य क्षेत्रात सेवा कार्य अधिक व्यापक व्हावे, असे आवाहन राज्यपाल देवव्रत यांनी केले.


हिंदुजा रुग्णालय समूहाच्या वतीने गेल्या 75 वर्षांत मानवतावादी दृष्टिकोनातून उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. देश-विदेशातील रुग्णांना दर्जेदार उपचार देऊन या संस्थेने भारताची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावली आहे, असे त्यांनी सांगितले.ग्रामीण व दुर्गम भागातील वंचित आणि गरजू रुग्णांना सेवा देण्याचे कार्य विशेष महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.


कॅन्सर, हृदयविकार, किडनीशी संबंधित आजारांच्या मुळावर उपचार होणे अत्यावश्यक असून, दिनचर्या, आहार पद्धती यांचा आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांनी सखोल विचार करणे गरजेचे असल्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत सांगितले.


राज्यात ५ किलोमीटरच्या अंतरावर आरोग्य सुविधा देण्यासाठी शासनाचे सातत्यपूर्ण प्रयत्न - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


राज्यात प्रत्येक नागरिकाला तो राहत असलेल्या ठिकाणापासून ५ किलोमीटरच्या अंतरावर सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन सातत्यपूर्ण प्रयत्न करीत आहे. या आरोग्य सुविधा सुलभ व सहजरित्या उपलब्ध होण्यासाठी खासगी क्षेत्रातील आणि धर्मदाय संस्थांच्यावतीने चालवण्यात येणारी रुग्णालये यांनी योगदान द्यावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्य शासन २ हजार ४०० पेक्षा जास्त विविध आजारांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांचा लाभ देत आहे. राज्यात प्रभावी आरोग्य सुविधा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी हिंदुजासारखे रुग्णालय राज्य शासनाला निश्चितच मदत करतील. देशाच्या फाळणीनंतर निर्माण झालेल्या विपरीत परिस्थितीत हिंदुजा समूहाने रुग्णसेवा सुरू केली. आज हिंदुजा समूहाची रुग्णालये देशातील नामांकित रुग्णालयांपैकी आहेत. या रुग्णालयांमध्ये अनेक देशांमधून नागरिक उपचारासाठी येऊन बरे होऊन जातात.


हिंदुजा विश्वस्तांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर समाज परिवर्तनाचे कार्य होत आहे. पालघर जिल्ह्यातील कुपोषणमुक्तीसाठी या समूहाने केलेले कार्य कौतुकास्पद आहे. रुग्णालयाच्या प्रयत्नांमुळे निश्चितच या भागात कुपोषणावर मात करण्यास मदत होत आहे. ‘जीव वाचवणे आणि निरोगी भारत निर्माण करणे' सुरू केलेली ही देशव्यापी मोहीम हिंदुजा रुग्णालयाच्या आरोग्य क्षेत्रातील कामाचे मूर्तीमंत उदाहरण असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.


क्षयरोगाचे जिवाणू औषधांना दाद न देण्याचा प्रकार (ड्रग रेजिस्टन्स) सर्वप्रथम हिंदुजा रुग्णालयाने शोधला. हिंदुजा रुग्णालयाचे हेच संशोधन पुढे राष्ट्रीय स्तरावर क्षयरोगाच्या प्रभावी उपचारासाठी धोरणाचा भाग बनले. टाईप वन मधुमेहामध्ये हिंदुजा समूहाच्यावतीने बालकांवर उपचाराचे मोठे काम केले जात असल्याचे गौरवोद्गारही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी काढले.


हिंदुजा समूहाचे अध्यक्ष अशोक हिंदुजा यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी प्रास्ताविकात समूहाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात सुरू असलेले विविध कार्यही, संशोधन, उपचार पद्धती याविषयी माहिती दिली.


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हिंदुजा रुग्णालयाच्यावतीने त्यांच्या कार्यावर आधारित आयोजित चित्र प्रदर्शनीला भेट दिली आणि हिंदुजा समूहाच्या विविध कार्याची माहिती घेतली.


कार्यक्रमाला विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार मिलिंद देवरा यांच्यासह हिंदुजा समूहाच्या रुग्णालयांमधील डॉक्टर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Eknath Shinde : आयुष्मान आरोग्य मंदिर व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय

Healthcare Services : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध

Shocking Video : किळसवाणा प्रकार! दादरमध्ये इडली बनवण्यासाठी चक्क शौचालयाच्या पाण्याचा वापर; व्हिडिओ व्हायरल

मुंबई : कामावर जाण्याची घाई आणि वेळेची कमतरता यामुळे अनेक मुंबईकर चाकरमानी सकाळचा नाश्ता रेल्वे स्टेशनबाहेरील

Passengers Stranded At Mumbai Airport : मुंबईत एअर इंडियाची विमानसेवा कोलमडली; ताटकळलेल्या प्रवाशांचा संताप

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) १८ मे रोजी एअर इंडिया (Air India) आणि एअर इंडिया