काँग्रेसने इतिहासात केलेल्या चुकांमुळेच आज दहशतवादाची समस्या उग्र झाली
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेदरम्यान काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल केला. त्यांनी ठामपणे सांगितले की, “काँग्रेसने इतिहासात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळेच आज देशाला दहशतवादासारख्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे.”
शाह यांनी १९६२च्या भारत-चीन युद्धाचा संदर्भ देत तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, नेहरूंनी अक्साई चीनचा ३८,००० चौरस किलोमीटर भूभाग चीनला दिला होता. नेहरू म्हणाले होते की, त्या भागात गवताची काडीही उगवत नाही, तर त्याचं काय करणार? त्यावर खासदार महावीर प्रसाद त्यागी यांनी प्रत्युत्तर दिलं होतं, ‘तुमच्या डोक्यावरही केस नाहीत, मग तेही चीनला द्यायचे का?’
इतिहासातील इतर अनेक घटनांवर भाष्य करत शाह म्हणाले की, १९४८ मध्ये भारतीय लष्कर काश्मीरमध्ये आघाडीवर असतानाही नेहरूंनी एकतर्फी युद्धविराम घोषित केला होता. “सरदार पटेल युद्ध थांबवू नका म्हणत होते, पण नेहरूंचा निर्णय वेगळा होता.”
ऑपरेशन सिंदूर चर्चेदरम्यान अखिलेश यादव यांच्या मध्येच टोकण्याला अमित शहा यांचे जबरदस्त प्रत्युत्तर नवी दिल्ली: लोकसभेत कालपासून ऑपरेशन सिंदूरवर ...
१९६० मधील सिंधू पाणी वाटप करारावर भाष्य करताना शाह म्हणाले, “भारतीय हिताच्या विरुद्ध जाऊन ८० % पाणी पाकिस्तानला देण्यात आले. आपण भौगोलिक आणि रणनीतिकदृष्ट्या मजबूत स्थितीत असतानाही असा निर्णय झाला.”
१९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात जिंकलेला महत्त्वाचा भूभाग १९६६ च्या करारात पाकिस्तानला परत देण्यात आल्याची आठवणही त्यांनी करून दिली.
१९७१ च्या युद्धावर बोलताना शाह म्हणाले, “इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून ऐतिहासिक विजय मिळवला. ९३ हजार पाकिस्तानी सैनिक युद्धकैदी होते, आणि १५ हजार चौरस किलोमीटर भूभाग भारताच्या ताब्यात होता. पण शिमला करारात सगळं पाकिस्तानला परत देण्यात आलं आणि पीओकेचा मुद्दा कायमचा गुंतागुंतीचा झाला.”
अमित शाह यांच्या या भाषणामुळे संसदेत काँग्रेसविरोधी वातावरण अधिक तापलं. ऐतिहासिक चुका उघड करत त्यांनी आजच्या सुरक्षाव्यवस्थेच्या प्रश्नांचे मूळ काँग्रेसच्या धोरणांमध्ये असल्याचं ठासून सांगितलं.