मुंबई : भारतीय टेलिव्हिजनवर सर्वात जास्त चाललेली आणि सोनी सबचा अभिमान असलेली ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही कौटुंबिक मालिका एक मोठा लक्षणीय टप्पा पार करत आहे. या मालिकेने तब्बल १७ वर्षे पूर्ण केली आहे, ज्यात ४४६० पेक्षा जास्त एपिसोड झाले आहेत, ज्यांनी लोकांना खूप हसवले आहे, जोडले आहे आणि आशा दिली आहे. नीला फिल्म प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली असित कुमार मोदी द्वारा निर्मित ही मालिका २००८ मध्ये सुरू झाली होती आणि आता सगळ्या पिढीतल्या प्रेक्षकांसाठी हे कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाव बनले आहे.
TMKOC या मालिकेला निरंतर मिळालेले यश हे त्यातील कलाकार, निष्ठावान क्रू, गुणी लेखक आणि द्रष्ट्या प्रॉडक्शन टीमच्या एकत्रित प्रयत्नांचे प्रतीक आहे. गोकुलधाम सोसायटीला देशातील घराघरात लाडकी बनवण्यासाठी मालिकेच्या प्रत्येक विभागाने-ऑन स्क्रीन आणि पडद्याच्या मागे- योगदान दिले आहे. स्वागतशील वृत्तीच्या गोकुळधाम सोसायटीची गोष्ट सांगणारी ही मालिका भारताच्या सांस्कृतिक मूल्यांमध्ये रूजलेली आहे. या मालिकेत दैनंदिन क्षण नर्म विनोदाच्या, सामुदायिक भावनेच्या आणि अर्थपूर्ण कथानकाच्या माध्यमातून सादर करण्यात येतात, जी सोनी सबची खास शैली आहे. यातील व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीच्या असल्यामुळेच इतका प्रदीर्घ काळ ही मालिका सुरू राहिली आहे. या व्यक्तिरेखा प्रेक्षकांसोबत वाढल्या, मोठ्या झाल्या आहेत आणि भारतीय कुटुंबातील सदस्य बनल्या आहेत.
एखादा छोटासा गैरसमज असो किंवा ऑनलाइन फ्रॉड अथवा शेजारी-पाजाऱ्यांमधील वाद-विवाद यांसारखा समाजाशी संबंधित एखादा विषय असो या मालिकेची ओळख असलेला साधेपणा आणि आशावाद मालिकेत कायम राहतो. टपु सेनेच्या निरागसतेपासून ते गोकुळधाममध्ये राहणारे जेठालाल, भिडे, पोपटलाल, बबिता, डॉ. हाथी, सोढी, तारक मेहता वगैरे सर्व व्यक्तिरेखांमधील तऱ्हेवाईकपणा हा या कथानकाचा अविभाज्य भाग आहे.
सोनी सबचे बिझनेस हेड अजय भालवणकर काय म्हणाले?
“सोनी सबमध्ये आम्ही ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेची १७ वर्षे सहर्ष साजरी करत आहोत. ह्या मालिकेने केवळ काळाची कसोटी पार केली नाही, तर समस्त देशातील कोट्यावधी चेहऱ्यांवर सतत हसू पसरवले आहे. हा टप्पा पार करणे ही काही साधीसुधी सिद्धी नाही. यामधून मालिकेचे कथानक, त्यातील लोभस व्यक्तिरेखा आणि त्यातून सांगितलेली मूल्ये यांची लोकप्रियता लक्षात येते. आम्ही असित कुमार मोदी आणि समस्त कलाकार आणि क्रू सदस्यांचे ऋणी आहोत, ज्यांनी अनेक वर्षांपासून ही मालिका यशस्वी करण्यासाठी निरंतर कष्ट घेतले आहेत. अत्यंत नाट्यात्म मालिकांच्या काळात तारक मेहता ही मालिका काहीतरी अस्सल प्रदान करते- विनोद, आशा आणि एकजूट! यातील साकारात्मकतेमुळे अनेक वर्षे या मालिकेने आपल्या प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे.”
असित कुमार मोदी, संस्थापक – नीला फिल्म प्रॉडक्शन्स प्रा. लि
“सतरा वर्षांपूर्वी आम्ही एका अशा मालिकेची निर्मिती केली होती, जी लोकांना हसवेल, कुटुंबांना एकत्र आणेल आणि ज्यामधून भारताचे अस्सल रूप दिसेल! आज तारक मेहता का उल्टा चश्मा ही केवळ एक मालिका राहिलेली नाही. ती एक भावना बनली आहे. गोकुळधाम सोसायटी हा लोकांच्या जीवनाचा भाग बनला आहे. या आपुलकीच्या नात्यातूनच आम्हाला निरंतर बळ मिळाले आहे. आमचे चाहते, अप्रतिम कलाकार आणि क्रू सदस्य, लेखक आणि सोनी सबमधील आमचे जुने भागीदार या सर्वांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करत आहे, कारण त्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून आमच्या व्हिजनवर विश्वास ठेवला. ही सिद्धी प्रत्येक प्रेक्षकाची आहे, ज्यांनी या मालिकेला आणि त्यातील व्यक्तिरेखांना आपलेसे केले.”
हा विशेष आनंदाचा प्रसंग मालिकेच्या कलाकारांनी, क्रू सदस्यांनी आणि निर्मात्यांनी एकत्र येऊन साजरा केला. या आनंद सोहळ्यात सहभागी झाले असित कुमार मोदी, सोनी सबचे बिझनेस हेड अजय भालवणकर आणि मुख्य कलाकारांपैकी दिलीप जोशी (जेठालाल), अमित भट्ट (चंपकलाल), श्याम पाठक (पोपटलाल), मंदार चांदवडकर (भिडे), सोनालिका जोशी (माधवी), तनुज महाशब्दे (अय्यर), मुनमून दत्ता (बबिता) आणि इतर कलाकार. कोट्यावधी लोकांना हसवणाऱ्या या मालिकेविषयी या कलाकारांनी आपले मनोगत व्यक्त केले. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेचा प्रत्येक भाग कथानकाची लोकप्रियता, एकत्रित प्रयत्न आणि सांस्कृतिक मूल्य भावनेची साक्ष देतो.
तब्बल सतरा वर्षे आणि यापुढेही..!
बघत रहा, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ दर सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता फक्त सोनी सबवर