नवी दिल्ली : देशात मान्सून सक्रिय झाल्याने अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा कहर सुरु आहे. झारखंडमध्ये चार तर बिहारमध्ये तीन महिलांचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाला असून दोन महिला भाजल्या आहेत. मात्र, पाटणा हवामान केंद्रानुसार सध्या बिहारमध्ये मान्सून कमजोर झाला असून पुढील ४८ तासांत पावसाची शक्यता नाही.
जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलन, सैन्य कॅम्पची भिंत कोसळली
जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले असून पुढील ७२ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिला आहे. काल राजौरी जिल्ह्यात सैन्य कॅम्पची भिंत कोसळून तीन कारचे नुकसान झाले.
मुंबई: महाराष्ट्रात सध्या मान्सूनने पुन्हा एकदा जोर धरला असून अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. हवामान विभागाने राज्यातील ...
वाराणसीमध्ये गंगेची पातळी कमी, पण घाट पाण्याखाली
वाराणसीत गंगेची पातळी घटत असून बुधवारी दरतास २ सेंटीमीटरने घट झाली आहे. सध्या गंगेची पातळी ६९.२४ मीटर आहे, पण अजूनही ८४ घाट पाण्याखाली आहेत. वरुणा भागात ३०,००० लोकसंख्या प्रभावित असून ४०० कुटुंबांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) टीम्सना वाराणसीतील पूरग्रस्त भागांमध्ये तैनात करण्यात आले आहे. कुणीही अडकलेला नसावा यासाठी सातत्याने गस्त घालण्यात येत आहे. मात्र, पावसाचा जोर कमी झाल्यामुळे गंगा आणि वरुणा या दोन्ही नद्यांच्या पाण्याची पातळी हळूहळू घटत आहे.
देशभरात पावसाचा ऑरेंज अलर्ट
आज (बुधवारी) जम्मू-काश्मीर, छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा, आसाम आणि मेघालयसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशात २६ जुलैपर्यंत पावसाची तीव्रता कमी राहील, त्यानंतर नवीन पावसाळी फेरी सुरु होण्याची शक्यता आहे.
२४ जुलैपासून कमी दाबाचा पट्टा तयार होणार
बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात २४ जुलैपासून कमी दाबाचा नवीन पट्टा तयार होणार असून त्यामुळे देशभरात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आहे.
मध्य प्रदेशात अतिवृष्टीचा इशारा; ५३% अधिक पर्जन्यमान
मध्य प्रदेशात मान्सून प्रणाली सक्रीय झाल्यामुळे मंगळवारी भोपाळ, इंदूर, तिकमगडसह २० जिल्ह्यांत मुसळधार पावसाची नोंद झाली. आजही जबलपूर, शेवपूर, मुरैना, नरसिंहपूर, छिंदवाडा, बालाघाट, डिंडोरी, अनूपपूर यासह १५ जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या राज्यात सरासरी २१ इंच पावसाची नोंद झाली असून ही प्रमाण अपेक्षित १३.७ इंचांपेक्षा ५३% अधिक आहे. ग्वाल्हेरसह काही जिल्ह्यांमध्ये ८० ते ९५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

छत्तीसगड, हिमाचल आणि पंजाबमध्येही पावसाचा जोर
छत्तीसगडमधील रायपूर, दुर्ग, बिलासपूर आणि बस्तरमध्ये चांगला पाऊस झाला असून ४५८.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
हिमाचल प्रदेशातील शिमल्यात बुधवारी सकाळी धुक्यामुळे दृश्यता ५० मीटरपेक्षा कमी झाली. सतलज नदीवरील धरणातून पाणी सोडल्यामुळे पातळी ४-५ मीटर वाढू शकते. नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पंजाबमधील पठाणकोट, होशियारपूर, रूपनगर, मोहालीमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पठाणकोटमध्ये ५० मिमी आणि लुधियानात ३१ मिमी पावसाची नोंद झाली. एका पूलावरून कार वाहून गेली आणि महापौर बलजीत सिंह यांनी पाण्यात उडी घेऊन कुटुंबाला वाचवले.
हरियाणातील सर्व २२ जिल्ह्यांत पावसाचा इशारा
हरियाणात सर्व जिल्ह्यांत आज पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस होऊ शकतो. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत २०% अधिक पाऊस झाला आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस
दिल्ली आणि एनसीआरमध्ये बुधवारी सकाळी जोरदार पावसामुळे वाहतूक कोंडी आणि पाणी साचल्याच्या घटना घडल्या. काल देखील अचानक पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले होते. सफदरजंग वेधशाळेत काल ८.८ मिमी, तर रीजमध्ये २२.४ मिमी पावसाची नोंद झाली. आयएमडी ने दिल्लीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.