इस्लामाबाद : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पहलगाम या पर्यटनस्थळी पर्यटनासाठी आलेल्यांवर गोळीबार केला. तब्बल २६ जणांची हत्या केली. या घटनेनंतर भारताने पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांचे नऊ तळ हवाई हल्ले करुन नष्ट केले. भारत अतिरेक्यांवर कारवाई करत असल्याचे बघून पाकिस्तानने भारतीय सैन्य तळांना आणि नागरी वस्त्यांना लक्ष्य करुन हवाई हल्ल्यांचा प्रयत्न केला. पण भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडले. पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताने चोख प्रत्युत्तर दिले. भारताचे ऑपरेशन सिंदूर सुरू असताना पाकिस्तानने भारतावर ८४० क्षेपणास्त्रे डागली. ही क्षेपणास्त्रे भारताचे नुकसान करण्यात अयशस्वी झाली, अशी माहिती आता पुढे आली आहे.
पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानच्या ११ विमानतळांवर हल्ले केले. या हल्ल्यांमुळे पाकिस्तानचे नुकसान झाले. रहीम यार खान विमानतळ आणि अण्वस्त्रे ज्या भागात होती तिथला सरगोधा विमानतळ यांचे प्रचंड नुकसान झाले. पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा भारतापुढे कुचकामी ठरली. याउलट भारताची हवाई संरक्षण यंत्रणा पाकिस्तान समोर कमालीची प्रभावी ठरली. पाकिस्तानचे ड्रोन, रॉकेट हल्ले आणि क्षेपणास्त्रे हल्ले अयशस्वी झाले. भारताच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानचे नुकसान झाले शिवाय त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला.
पाकिस्तानचे हवाई हल्ले लक्ष्य साधण्याआधीच भारताच्या प्रतिहल्ल्यात निकामी झाले. पाकिस्तानची काही क्षेपणास्त्र आणि ड्रोन स्फोट करण्यातच अपयशी ठरले आणि भारताच्या हद्दीत मोकळ्या मैदानात पडले. ही क्षेपणास्त्र आणि ड्रोन जप्त करुन भारताने त्यांची तपासणी सुरू केली आहे. यामुळे पाकिस्तानच्या हवाई सामर्थ्याविषयी भारताच्या हाती भरपूर महत्त्वाची माहिती आहे. याउलट भारताच्या हवाई सामर्थ्याबाबत फक्त अंदाज बांधणेच पाकिस्तानला शक्य होत आहे.
प्रामुख्याने चिनी हवाई संरक्षण यंत्रणेवर अवलंबून असलेल्या पाकिस्तानची अवस्था दयनीय झाली. पाकिस्तानची एचक्यू ९ हवाई संरक्षण यंत्रणा अयशस्वी झाली. भारताने मुरीदके येथे लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय, बहावलपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय, लाहोरमधील पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा पुरती निकामी केली.