मुंबई: छोट्या पडद्यावर गेल्या १७ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' सध्या पुन्हा एकदा टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानी पोहोचली आहे. भूताच्या ट्रॅकमुळे प्रेक्षकांची पसंती मिळवत या मालिकेने इतर अनेक मालिकांना मागे टाकले आहे. सध्या मालिकेत जेठालाल गडा या पात्रावर लक्ष केंद्रित केले जात असले तरी, प्रेक्षकांना अजूनही दयाबेन या पात्राची आणि ती साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी हिची आठवण येत आहे. चाहते सातत्याने निर्मात्यांना दिशाच्या पुनरागमनाबद्दल विचारणा करत आहेत.
निर्माते असित मोदी काय म्हणाले?
'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी दयाबेनच्या पुनरागमनावर आणि मालिकेच्या यशाबाबत बोलताना सांगितले की, "प्रेक्षक दयाबेन मालिकेत कधी परतणार याबद्दल सतत विचारत असतात. दिशाजींनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर खोल छाप सोडली आहे. त्यांनी मालिका सोडून आठ वर्षे झाली आहेत, तरीही लोक त्यांना आठवतात. त्यांनी साकारलेले पात्र अजूनही लोकांच्या मनात जिवंत आहे, इतक्या उत्तम पद्धतीने त्यांनी ती भूमिका साकारली होती."
दिशा वकानीला मालिकेत परत आणण्याबद्दल बोलताना असित मोदींनी स्पष्ट केले की, "दिशाजींना परत आणणं सोपं नाही, त्यासाठी योग्य वेळ आणि योग्य परिस्थितीची आवश्यकता आहे." सध्या ते मालिकेच्या कथाकथनावर लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांनी सांगितले. "जेव्हा कथा मजबूत असते, तेव्हा लोक आपोआप कथानकाशी जोडले जातात. एखाद्या पात्राची अनुपस्थिती फारशी जाणवत नाही. हा शो नेहमीच त्याच्या कथेमुळे टिकून राहिला आहे. जोपर्यंत आम्ही मनोरंजक कंटेंट देत आहोत, तोपर्यंत काही पात्रे मालिकेत असोत किंवा नसोत, लोक जोडलेले राहतात," असेही मोदींनी नमूद केले.
यावरून तरी, नजीकच्या भविष्यात दिशा वकानी 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत परतण्याची शक्यता कमीच असल्याचे दिसते. मात्र, दयाबेनच्या पात्राची क्रेझ आजही कायम असल्याचे निर्मात्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते.