राज ठाकरे संतापले : 'महाराष्ट्राची काय अवस्था झालीये? कोणाच्या हातात दिलाय महाराष्ट्र?' विधान भवनातील हाणामारीवर तीव्र प्रतिक्रिया!

मुंबई : काल (गुरुवारी) विधानभवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेची चित्रफीत पाहिल्यानंतर त्यांना "महाराष्ट्राची काय अवस्था झालीये?" असा प्रश्न पडल्याचे त्यांनी आपल्या 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) या समाजमाध्यमावर म्हटले आहे.


यावेळी राज ठाकरे यांनी मनसे आणि आपल्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, "मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्याच्यावर, आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसलेत?" मराठी भाषेला किंवा मराठी माणसाच्या गळ्याला कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिक त्याला दणका देतो याचा मला अभिमान आहे, कारण ते कृत्य व्यक्तिगत हेव्यादाव्यातून येत नाही तर ते भाषा आणि मराठी माणसासाठी असते, असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या दिवंगत आमदारानेही विधान भवनात एका मुजोर आमदाराला दणका दिला होता, तो व्यक्तिगत द्वेषातून नसून मराठीला कमी लेखण्याचा प्रयत्न केला म्हणून होता, असे त्यांनी नमूद केले. पण आता झालेल्या हाणामारीबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.


अधिवेशनावर होणाऱ्या खर्चावरूनही राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, अचूक आकडेवारी नसली तरी, एका जुन्या अंदाजानुसार अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च किमान दीड ते दोन कोटी रुपये असतो. "हे पैसे तुमच्या व्यक्तिगत शेरेबाजीसाठी वाया घालवायचे?" असा संतप्त सवाल त्यांनी केला. महाराष्ट्रात अनेक प्रश्न प्रलंबित असताना, राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना, कंत्राटदारांची देणी रखडली असताना आणि जिल्ह्यांना विकास निधी मिळत नसताना अशा घटना घडणे निषेधार्ह असल्याचे त्यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारत आहेत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का, असेही त्यांनी म्हटले. या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून माध्यमांना खाद्य पुरवण्यासाठी या उथळ गोष्टी घडू दिल्या जात आहेत का, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.


राज ठाकरे यांनी भविष्यात अशा घटनांना माफ केल्यास काय परिणाम होतील, याची भीती व्यक्त केली. ते म्हणाले, "आज अशा लोकांना जर माफ केलं गेलं तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यात विधान भवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही!"



राज ठाकरे यांचे ट्विट, जसेच्या तसे... येथे वाचा...




काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, ' काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?'


सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे वाट्टेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं, त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधनशुचितेच्या गोष्टी बोलायच्या हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल असं मी मानतो. मी तर मराठी जनतेलाच विचारेन, 'कोणाच्या हातात दिला आहेत महाराष्ट्र?'


मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्याच्यावर, आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसलेत? जेंव्हा मराठी भाषेला किंवा मराठी माणसाच्या गळ्याला कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिक त्या व्यक्तीला दणका देतो याचा मला अभिमान आहे कारण ते कृत्य हे व्यक्तिगत हेव्यादाव्यातून येत नाही तर ते माझ्या भाषेसाठी आणि माझ्या मराठी माणसासाठी असतं. माझ्या दिवंगत आमदाराने पण विधानभवनात एका मुजोर आमदाराला दणका दिला होता, तो व्यक्तिगत द्वेषातून नव्हता तर मराठीला कमी लेखायचा प्रयत्न केला होता म्हणून. पण यांचं काय?


अचूक आकडेवारी जरी माझ्याकडे नसली तरी, एका जुन्या अंदाजानुसार अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च हा किमान दीड ते दोन कोटी रुपये असतो. हे पैसे तुमच्या व्यक्तिगत शेरेबाजीसाठी वाया घालवायचे? महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबीत आहेत, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, कंत्राटदारांची देणी रखडली आहेत, जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाहीये... सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारत आहेत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का? या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून माध्यमांना खाद्य पुरवण्यासाठी या उथळ गोष्टी घडू दिल्या जात आहेत? आज अशा लोकांना जर माफ केलं गेलं तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही !


माध्यमांमध्ये जे काही थोडे सूज्ञ आवाज उरलेत त्यांना विनंती आहे की या भंपक प्रकारणांच्यात तुम्हाला कितीही गुंतवायचा प्रयत्न झाला तरी त्यात अडकू नका आणि सरकारला पण माझं आव्हान आहे की जर थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकांवर पण कारवाई करून दाखवा. जर ती तुम्हाला करायची नसेल तर हरकत नाही, मग मात्र मुजोर मराठी द्वेष्ट्याना माझे महाराष्ट्र सैनिक हात सोडून सरळ करतील तेंव्हा आम्हाला अक्कल शिकवू नका.

Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील