जनसुरक्षा विधेयकास विरोध करणाऱ्यांना आ. दरेकरांचे खडेबोल
मुंबई: विरोधकांना डाव्या विचारसरणीचा अचानक पुळका आलाय. देशासह राज्यात सरकार विरोधात माथी भडकविण्याचे प्रयत्न केले जाताहेत. लव्ह जिहादची प्रकरणे होताहेत. वेगवेगळ्या मार्गाने डाव्या विचारसरणीची घुसखोरी सुरु आहे. त्यांच्या नांग्या ठेचण्यासाठी आपण कायदा आणणार आहोत. मात्र त्याला विरोधक देशविघातक म्हणणार असतील तर यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही, अशा शब्दांत भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले.
आज विधानपरिषदेच्या सभागृहात गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी जनसुरक्षा विधेयक मांडले. या विधेयकावर बोलताना आ. दरेकर म्हणाले की, विरोधकांना डाव्या विचारसरणीचा अचानक पुळका आलाय. स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी या विचारसरणीला हद्दपार केले होते. या विघातक प्रवृत्ती झोपडपट्टी, आदिवासी पाड्यांत शिरकाव करताहेत. अनिल परब यांच्या भाषणातून राजकारणाचा वास आला. हे बिल आणल्यावर सरकार आणि मुख्यमंत्र्यांचे स्वागत कराल असे वाटले होते परंतु आपण राजकारणी इतके बरबटलो आहोत की जनतेच्या सुरक्षेची काळजी नाही. हे भाजपा सुरक्षा विधेयक की जनसुरक्षा विधेयक बोलता. होय भाजपा हा जनमनाला मानणारा पक्ष आहे. भाजपा म्हणजेच मन, भाजपा म्हणजेच लोकं, भाजपा म्हणजेच जनता. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करताहेत. त्यामुळे हे जनसुरक्षा विधेयक एका व्यापक विचाराने आणले असल्याचे दरेकर म्हणाले.
या विधेयकाकडे राजकारणा पलीकडे जाऊन पाहायला हवे
ते पुढे म्हणाले की, जिथे भाजपचे राज्य नाही त्या चार राज्यांनाही हे बिल आहे. त्यांना जाऊन हे विरोधक विचारणार का? हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. तिथे नाही म्हणून इथे येऊन कुरापती करणार असाल तर त्या प्रवृत्तीचा निपात केल्याशिवाय राहणार नाही. आपण या विधेयकाकडे राजकारणापलीकडे जाऊन पाहायला हवे.
ज्यावेळी नारायण राणे यांचे घर तोडायला माणसे पाठवता तेव्हा कायदा कुठे गेला होता? तेव्हा मुख्यमंत्री कोण होते? सरकार कुणाचे होते? या प्रविण दरेकरला अटक करायला अतिरिक्त पोलीस आयुक्तांना सांगणारा तुमचा नेता, सरकार होते. ही वृत्ती देशविघातक प्रवृत्तीना पाठीशी घालणारी आहे. नक्षलवाद संपलेला नाही. या सरकारने तो संपविण्याचा विडा उचलला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीसारख्या छोट्याशा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले. तेथे स्टीलचे उद्योग येताहेत, अनेक नक्षली शरण येताहेत हे देशहिताचे नाही का? असा सवाल दरेकरांनी विरोधकांना विचारला.
सरकार विरोधात जनसामान्यांची माथी भडकविण्याचे प्रयत्न केले जाताहेत
दरेकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आधार घेऊन डाव्या विचारसरणीच्या विचारांना आपण साथ देणार आहोत का? गरीब असेल तर त्याची असहाय्यता बघून वेगवेगळी प्रलोभने देऊन आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न होतोय. सरकार विरोधात माथी भडकविण्याचे प्रयत्न केले जाताहेत. देशात लव्ह जिहादची प्रकरणे होताहेत. वेगवेगळ्या मार्गाने डाव्या विचारसरणीची घुसखोरी सुरु आहे. त्यांच्या नांग्या ठेचण्यासाठी कायदा आणणार असू त्याला विरोधक देशविघातक म्हणणार असतील तर यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाची, देशभक्तीची विचारसरणी दिली. जेव्हा डाव्या विचारसरणीचे लोकं आपल्या मुळावर यायला लागले तेव्हा त्यांना ठेचून काढण्याचे काम केले.
महाराष्ट्रातील जनता बिलाच्या मागे ठामपणे उभी राहील
दरेकर म्हणाले की, आज आपला देश बलवान होतोय. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश पुढे जातोय. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली विकास होतोय. हे असे चांगले होत राहिले तर भविष्यात काय होईल या संकुचित मानसिकतेतून काही विरोधक ही पेरणी करताहेत. त्या पेरणीला छेद देण्याचे काम या कायद्याद्वारे होणार आहे. आपला देश सर्वार्थाने पुढे जातोय. राज्य विकासाकडे जातेय. विकास करु, देश पुढे जाईल पण अशा प्रकारच्या मानसिकता आडून वाढणार असतील तर त्याला पुरे कसे पडणार. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी पहिले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले असते असे सांगत महाराष्ट्रातील जनता या बिलाच्या मागे ठामपणे उभी राहील असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.