वडोदरा: गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. बुधवारी सकाळी ७:३० वाजता महिसागर नदीवरील ४३ वर्षे जुना गंभीरा पूल कोसळला, यात १० जणांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. हा पूल मध्य गुजरात आणि सौराष्ट्राला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा होता.
या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही मृतांच्या वारसांना ४ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपये देण्याची घोषणा केली आहे.
वडोदरा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक रोहन आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलाचा १०-१५ मीटर लांबीचा एक स्लॅब कोसळल्यामुळे दोन ट्रक, एक ईको व्हॅन, एक पिकअप व्हॅन आणि एक ऑटोरिक्षा नदीत कोसळली. वडोदरा कलेक्टर अनिल धमेलिया यांनी सांगितले की, बचाव पथकांनी आतापर्यंत ९ मृतदेह बाहेर काढले आहेत आणि ६ जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. जखमींना वडोदरा येथील एसएसजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (NDRF) तातडीने बचाव कार्य सुरू केले. मात्र, काही स्थानिकांनी प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, पुलाची दुरवस्था असूनही त्याच्या दुरुस्तीचे प्रस्ताव वारंवार दुर्लक्षित केले गेले. यावर गुजरातचे आरोग्य मंत्री ऋषिकेश पटेल यांनी सांगितले की, १९८५ मध्ये बांधलेल्या या पुलाची वेळोवेळी देखभाल केली जात होती, परंतु दुर्घटनेच्या कारणांचा सखोल तपास केला जाईल. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या घटनेच्या चौकशीसाठी तातडीने तज्ज्ञांची एक समिती नेमली असून, त्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.