Thursday, March 26, 2026

दुर्दैवी घटना: पंढरपूरमध्ये कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

दुर्दैवी घटना: पंढरपूरमध्ये कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

पंढरपूर: आषाढी एकादशीच्या मंगलमय वातावरणात विठुरायाच्या पंढरपूरनगरीत एक अत्यंत धक्कादायक घडली आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी आपले जीवन संपवले आहे. पत्नी, दोन मुले आणि पतीने केलेल्या आत्महत्येमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कासेगाव येथील रहिवासी म्हमाजी आसबे यांच्या कुटुंबात ही दुर्दैवी घटना घडली. पती म्हमाजी आसबे (वय अंदाजे 30-35) यांच्या द्राक्षबागेतील विहिरीत त्यांची पत्नी मोनाली आसबे (वय २५), मुलगा कार्तिक (वय ६) आणि मुलगी प्रगती (वय ४) यांनी उडी मारून आत्महत्या केली. पत्नी आणि मुलांनी विहिरीत उडी घेतल्याचे समजल्यानंतर मोठा धक्का बसलेल्या म्हमाजी आसबे यांनी घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले. आषाढी एकादशीच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच, पंढरपूर तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतील पाणी उपसण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले. सध्या केवळ चार वर्षांच्या कार्तिकचा मृतदेह सापडला असून, मोनाली आणि प्रगती यांचे मृतदेह शोधण्यासाठी आपत्कालीन यंत्रणांकडून मदत घेतली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद हेच या सामूहिक आत्महत्येमागचे कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे कासेगावसह संपूर्ण पंढरपूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment