Emergency : आणीबाणी लादणाऱ्यांनी संविधानाची हत्या केली - पंतप्रधान

नवी दिल्ली : देशावर आणीबाणी लादण्यात आली, त्या घटनेला काही दिवसांपूर्वी पन्नास वर्षे पूर्ण झाली. आपण देशवासियांनी संविधान हत्या दिवस पाळला. आपण नेहमी त्या सर्व लोकांचे स्मरण करायला हवं, ज्यांनी नेटाने आणीबाणीचा सामना केला होता. यामुळे आपल्याला आपल्या संविधानाला सशक्त राखण्यासाठी निरंतर सजग राहण्याची प्रेरणा मिळते. आणीबाणी लादणाऱ्यांनी केवळ आपल्या संविधानाची हत्या केली नाही, तर त्यांचा हेतू न्यायपालिकेलाही आपले गुलाम बनवून ठेवण्याचा होता, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ‘मन की बात’ (123 वा भाग) कार्यक्रमातून त्यांनी देशवासियांशी संवाद साधला.


पंतप्रधान पुढे म्हणाले की, आणीबाणीच्या काळात लोकांवर अत्याचार झाले. अनेकांना क्रूर छळ देण्यात आले. मिसा अंतर्गत, कोणालाही अशाच प्रकारे अटक करता येत होती. त्यांच्यावर असे अमानुष अत्याचार करण्यात आले. शेवटी, जनतेचा विजय झाला आणि आणीबाणी उठवण्यात आली. जनतेचा विजय झाला आणि आणीबाणी लादणारे हरले. या काळात लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास दिला गेला. याची अशी अनेक उदाहरणे आहेत, जी कधीही विसरता येणार नाहीत, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी आणीबाणीच्या काळाचे स्मरण केले.


एपिसोडच्या सुरुवातीला त्यांनी योग दिनाबद्दल सांगितले. ते म्हणाले की, २१ जून रोजी देश आणि जगातील कोट्यवधी लोकांनी आंतरराष्ट्रीय योग दिनात भाग घेतला. योगाची भव्यता वाढत आहे, लोक ते त्यांच्या दैनंदिन जीवनात स्वीकारत आहेत. यावेळी आम्हाला योग दिनाचे आकर्षक फोटो दिसले. विशाखापट्टणममध्ये ३ लाख लोकांनी एकत्र योगा केला. आपल्या नौदलाने जहाजांवर योगा केला आणि जम्मूमध्ये लोकांनी जगातील सर्वात उंच पुलावर योगा केला. वडनगरमध्ये २१०० लोकांनी एकत्र भुजंगासन करून विक्रम केला. दोन हजारांहून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांनी 108 मिनिटांमध्ये 108 सूर्यनमस्कार घातले. विचार करा, किती शिस्तीचं पालन आणि समर्पण असेल. तेलंगणामध्ये तीन हजार दिव्यांग मित्र एकत्रितपणे योग शिबिरात सहभागी झाले. त्यांनी दाखवून दिलं की कशा प्रकारे योग सशक्तीकरणाचे देखील माध्यम आहे. दिल्लीच्या लोकांनी योगला स्वच्छ यमुनेच्या संकल्पाशी जोडलं आणि यमुना किनारी जाऊन योगसाधना केली. हिमालयाची बर्फाच्छादित शिखरं आणि ‘आयटीबीपी’चे जवान, तिथे देखील त्यांनी योगाभ्यास केला, साहस आणि साधना एकत्र पाहायला मिळाले. गुजरातच्या लोकांनी देखील एक नवीन इतिहास रचला. न्यूयॉर्क, लंडन, टोकियो, पॅरिस जगातल्या प्रत्येक मोठ्या शहरांमधील योगदिनाची छायाचित्र समोर आली आहेत आणि प्रत्येक छायाचित्रात एक गोष्ट खास राहिली आहे, शांतता, स्थैर्य आणि संतुलन. या वर्षाची संकल्पना अतिशय खास होती, Yoga for One Earth, One Health, म्हणजे “एक पृथ्वी एक आरोग्य”. ही केवळ एक घोषणा नाही तर एक दिशा आहे जी आपल्याला ‘वसुधैव कुटुंबकएम्’ची जाणीव करून देते. मला विश्वास आहे, यावर्षीची योग दिनाची भव्यता जास्तीत जास्त लोकांना योग साधनेचा अवलंब करण्यासाठी नक्कीच प्रेरित करेल.


प्रदीर्घ काळानंतर कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. कैलास मानसरोवर म्हणजेच भगवान शिव यांचं धाम. हिंदू, बौद्ध, जैन प्रत्येक परंपरेत कैलास हे श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र मानलं गेलं आहे. मित्रांनो, तीन जुलैपासून पवित्र अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे आणि पवित्र श्रावण महिना देखील काही दिवसांवर आला आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी आपण भगवान जगन्नाथ जी यांची रथयात्रा देखील पाहिली. ओदिशा असेल, गुजरात असेल किंवा देशातला कुठलाही कानाकोपरा असेल, लाखो श्रद्धाळू या यात्रांमध्ये सहभागी होतात. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत या यात्रा 'एक भारत श्रेष्ठ भारत' भावनेचे प्रतिबिंब आहेत. जेव्हा आपण श्रद्धा भावनेनं, पूर्ण समर्पणानं आणि शिस्तबद्धतेनं आपल्या धार्मिक यात्रा पार पाडतो तेव्हा त्याचं फळ देखील मिळतं. यात्रेला जाणाऱ्या सर्व सौभाग्यशाली श्रद्धाळूंना मी माझ्या शुभेच्छा देतो. जे लोक सेवाभावनेनं या यात्रा यशस्वी आणि सुरक्षित बनवण्यासाठी झटत आहेत त्यांना देखील मी शुभेच्छा देतो.


देशातल्या दोन अशा यशस्वी कामगिरीबाबत सांगू इच्छितो ज्यामुळे तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल. या कामगिरीची चर्चा जागतिक संस्था करत आहेत. डब्ल्यूएचओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना आणि आयएलओ म्हणजेच आंतरराष्ट्रीय श्रम संघटना यांनी देशाच्या या उपलब्धींची भरपूर प्रशंसा केली आहे. पहिली कामगिरी आहे ती आपल्या आरोग्याशी निगडित आहे . तुमच्यापैकी अनेक लोकांनी डोळ्यांच्या एका आजाराबाबत ऐकलं असेल, ट्रॅकोमा. हा आजार जिवाणूमुळे पसरतो. एक काळ होता जेव्हा हा आजार देशातल्या अनेक भागांमध्ये सहजपणे आढळत होता. जर लक्ष दिलं नाही तर या आजारामुळे हळूहळू आपली दृष्टी देखील जाऊ शकते. आम्ही संकल्प केला की ट्रॅकोमाचं समूळ उच्चाटन करायचं आणि मला तुम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओ ने भारताला ट्रॅकोमा- फ्री घोषित केलं आहे, आता भारत ट्रॅकोमा-मुक्त देश बनला आहे.


हे त्या लाखो लोकांच्या मेहनतीचं फळ आहे, ज्यांनी न थकता, न थांबता या आजाराविरुद्ध लढा दिला. हे यश आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे देखील आहे. स्वच्छ भारत अभियानामुळे देखील याच्या निर्मूलनात मोठी मदत मिळाली. जलजीवन अभियानाचे देखील या यशात मोठे योगदान राहिलं आहे. आज जेव्हा घरोघरी नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे, तेव्हा अशा आजारांचा धोका कमी झाला आहे. जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यूएचओ ने देखील या गोष्टीची प्रशंसा करताना म्हटलं आहे कि भारताने आजाराविरोधात लढा देण्याबरोबरच त्याला कारणीभूत मुळांवर देखील घाव घातला आहे.


आज भारतात बहुतांश लोकसंख्या कुठल्या ना कुठल्या सामाजिक सुरक्षा लाभांचा फायदा घेत आहे आणि आता नुकताच आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचा -आयएलओ चा एक महत्त्वपूर्ण अहवाल आला आहे. या अहवालात म्हटलं आहे की भारतातील 64 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला आता कुठला ना कुठला सामाजिक सुरक्षा लाभ नक्की मिळत आहे. सामाजिक सुरक्षा ही जगातील सर्वात मोठी व्याप्ती असलेल्यापैकी एक आहे. आज देशात सुमारे 95 कोटी लोक कुठल्या ना कुठल्या सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेत आहेत. त्या उलट 2015 पर्यंत 25 कोटींपेक्षा कमी लोकांपर्यंत सरकारी योजना पोहोचू शकत होत्या.


भारतात आरोग्यापासून ते सामाजिक सुरक्षा पर्यंत प्रत्येक क्षेत्रात देश परिपूर्णतेच्या भावनेने पुढे जात आहे. हे सामाजिक न्यायाचे देखील एक उत्तम चित्र आहे. या यशामुळे एक विश्वास निर्माण झाला आहे की आगामी काळ अधिक चांगला असेल, प्रत्येक पावलावर भारत आणखी सशक्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Sonam Wangchuk Fast : 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांनी सोडलं उपोषण; हिंसाचार टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय

Sonam Wangchuk Fast : सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी 26 दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण अखेर मागे घेतले आहे. दीर्घ चर्चेनंतर

Sikkim Tunnel Accident : सिक्कीम टनल दुर्घटनेतील मृतांचा आकडा 25 झाला

गंगटोक : सिक्कीममधील एनएचपीसीच्या तीस्ता स्टेज-6 जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात मिथेन

India at UN : संयुक्त राष्ट्र बैठकीत भारताचा पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा; बलुचिस्तानातील संसाधनांच्या शोषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

संयुक्त राष्ट्रांच्या (UN) उच्चस्तरीय बैठकीत भारताने नैसर्गिक संसाधनांच्या न्याय्य वापराचा मुद्दा उपस्थित करत

Monsoon Update 2026 : भारतात मान्सूनचा हाहाकार! अनेक राज्यांत पूर, दरडी कोसळल्या; IMD कडून अतिमुसळधार पावसाचा इशारा

गुजरातसह उत्तर आणि ईशान्य भारतात पावसाचे थैमान नवी दिल्ली : जुलै महिन्याच्या सुरुवातीला काहीसा मंदावलेला

Assam Flood Updates : आसाममध्ये पुराचा हाहाकार : २४ तासांत १० जणांचा मृत्यू; शिवसागर आणि जोरहाटला सर्वाधिक फटका

दिसपूर : आसाममध्ये पावसाचा जोर ओसरण्याचे नाव घेत नसून पुराचे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालले आहे. राज्यातील

Bengaluru Triple Murder : AIच्या मदतीने रचला 3 खुनांचा कट; बंगळुरू ट्रिपल मर्डरप्रकरणात धक्कादायक माहिती समोर

बंगळुरू : बंगळुरूमधील चर्चेत असलेल्या तिहेरी हत्याकांडाच्या (Triple Murder Case) तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.