मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा!


मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून प्रचास करून अगदी वेळेवर गरम डबा पोहोचवणारे आपले सगळ्यांचे लाडके मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार आहेत. त्यांच्या कामाची अचूकता जगभरात प्रसिद्ध आहे. पण एक दिवस असा असतो, जेव्हा हे डबेवाले कामापेक्षा आपल्या श्रद्धेला महत्त्व देतात. येत्या सोमवारी, ७ जुलै २०२५ रोजी हेच डबेवाले आपली डबे पोहोचवण्याची सेवा एक दिवसासाठी बंद ठेवणार आहेत. आषाढी एकादशीच्या वारीला जायचे असल्याने, मुंबईचे डबेवाले एक दिवसाची सुट्टी घेणार आहेत. 'मुंबई डबेवाला' असोसिएशनने खास याबाबतची घोषणा केली आहे. त्यांच अनेक सदस्य पंढरपूरच्या वारीत सहभागी होण्यासाठी जातात, त्यामुळे या दिवशी डबेवाटप बंद राहील, असे त्यांनी आपल्या ग्राहकांना कळवलं आहे.


आषाढी एकादशीला हजारो वारकरी, म्हणजे विठ्ठलाचे भक्त, दिवसेंदिवस पायी चालत, असीम श्रद्धेने पंढरपूरकड़े जातात. हा प्रवास आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संपतो. तिथे संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांसारख्या महान संतांचा जयजयकार होतो. डबेवाल्यांसाठी ही वारी केवळ धार्मिक विधी नाही, तर तो त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे.


मुंबई डबेवाला असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने 'मिड डे'शी बोलताना सांगितलं, वारी म्हणजे आम्ही कोण आहोत, याचा एक भाग आहे. यामुळे आम्हाला आमची मूल्यं, आमचा समृद्ध वारसा आणि आपलेपणाची भावना पुन्हा एकदा अनुभवता येते. म्हणूनच, दरवर्षी आमच्यापैकी बरेच जण पंढरपूरला पायी जातात. आणि यासाठीच, ७जुलै रोजी आम्ही आमची डबे सेवा बंद ठेवून या पवित्र यात्रेत सामील होणार आहोत." डबेवाल्यांची ही सेवा दररोज मुंबईतील हजारो ऑफिस कर्मचाऱ्यांपर्यंत घरचे ताजे जेवण पोहोचवते. पण वर्षातून एकदा, त्यांची ही धार्मिक निष्ठा त्यांना पंढरपूरला घेऊन जाते, त्यांची ही सुट्टी एक दिवसाचीच असून, पुढील दिवसापासून, म्हणजे ८ जुलै २०२५ पासून, डबेवाल्यांची सेवा नेहमीप्रमाणे सुरू होईल. त्यामुळे, मुंबईतील सर्व ऑफिसवाल्यांना ७जुलै रोजी दुपारच्या जेवणाची पर्यायी व्यवस्था स्वतःच करावी लागेल.

Comments
Add Comment

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य

कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता

आता बँकेसारख्या सुविधा लवकरच! मुंबई : देशातील कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता आहे. गेल्या काही

हार्बरवर साडेचौदा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक

मुंबई : कुर्ला ते टिळकनगरदरम्यान वळण मार्गिकांच्या कामासाठी शनिवारी रात्री ११.०५ ते उद्या, रविवार दुपारी १.३५